पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी
मंचावर आलेल्या काही विद्यार्थिनींनी घरातील बंधने, सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड आणि शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणींबाबत आपले अनुभव सांगितले. मुलींना शिक्षण आणि जीवनात पुढे जाण्यासाठी अधिक संधी मिळणे आवश्यक असल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.
महिलांच्या सुरक्षिततेसोबतच त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आणि समान संधी मिळण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
‘महिला या देशाची सर्वात मोठी ताकद’; राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’मध्ये तरुणाईशी संवाद
राहुल गांधी यांनी संवादादरम्यान एक PPT सादर करत महिलांवरील हिंसाचाराशी संबंधित काही आकडेवारी मांडली. देशातील अनेक महिलांना लैंगिक अत्याचार आणि विविध प्रकारच्या हिंसाचाराला सामोरे जावे लागत असल्याचा दावा त्यांनी केला. यातील अनेक घटनांची अधिकृत नोंदच होत नसल्याने प्रत्यक्ष परिस्थिती उपलब्ध आकडेवारीपेक्षा गंभीर असू शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
राहुल गांधी यांनी मुलींच्या जन्मापूर्वी होणाऱ्या कथित भ्रूणहत्येपासून ते सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड आणि घरगुती हिंसाचारापर्यंत विविध मुद्दे उपस्थित केले. कार्यक्रमाला उपस्थित तरुणींमधील मोठ्या प्रमाणावर मुलींना छेडछाडीचा अनुभव असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच महिलांवरील शारीरिक हिंसाचार आणि बलात्काराच्या घटनांबाबतही त्यांनी काही आकडे सभेत मांडले.
बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांकडे केवळ आकडे म्हणून न पाहता त्यामागील सामाजिक वास्तव समजून घेण्याची गरज असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. महिलांना सुरक्षित वातावरण, शिक्षण आणि समान संधी उपलब्ध करून देणे ही समाजाची जबाबदारी असल्याचा संदेश त्यांनी दिला.
पुण्यातील या कार्यक्रमात राजकीय भाषणापेक्षा तरुणींचे प्रश्न आणि महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. त्यामुळे राहुल गांधींच्या या संवादाकडे राजकीय वर्तुळासोबतच तरुणाईचे लक्ष वेधले गेले.






