अकोला (Akola). अनेक जण कोरोना लसिकरणानंतर (corona vaccination) किमान अर्धा तास केंद्रात बसून राहणे टाळतात. मात्र, असे करणे अनेकांना महागात पडू शकते. लसीची ॲलर्जी असलेल्यांसाठी (allergic) हा अर्धा तास महत्त्वाचा असतो. त्यामुळे लस घेतल्यानंतर घरी जाण्याची घाई महागात पडू शकते.
[read_also content=”कोरोना अपडेट/ नागपुरात कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या एकवर; पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतीवर https://www.navarashtra.com/latest-news/corona-update-number-of-corona-patient-deaths-at-one-the-number-of-positive-patients-is-increasing-nrat-146430.html”]
आतापर्यंत केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांनाच लस दिली जात होती. मात्र, आता पुन्हा ३० ते ४४ वर्षे वयोगटातील लसीकरणालाही १९ जूनपासून सुरुवात करण्यात आली आहे.
त्यामुळे लस घेणाऱ्या लाभार्थींची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील लसीकरणाचा टक्काही आता वाढण्याची शक्यता आहे. येणारा आठवडा लसीकरणाचे लाभार्थी वाढविणारा आहे. मात्र, लस घेताना आरोग्य विभागाकडून सांगण्यात येणाऱ्या सूचनांचे पालनही आवश्यक आहे. बहुतांश लाभार्थी आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. लस घेतल्यानंतर लसीकरण केंद्रात किमान ३० मिनिटेही कोणी थांबत नसल्याचे चित्र दिसून येते. लस घेतली की, चार ते पाच मिनिटांतच लाभार्थी लसीकरण केंद्राबाहेर निघून जातात.
म्हणून लसीकरणानंतर ३० मिनिटे थांबणे आवश्यक
कोविड प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर अनेकांना काही दुष्परिणाम जाणवतात. हे दुष्परिणाम आपल्याला जाणवतात का? हे लसीकरणाच्या अर्ध्या तासात समजू शकते. त्यामुळे काही दुष्परिणाम जाणवल्यास तातडीने वैद्यकीय उपचारही घेणे शक्य होते.
लसीची ॲलर्जी असलेल्यांमध्ये ॲनाफिलॅक्सिस होण्याची शक्यता असते. त्यामुळे लसीकरणानंतरचा अर्धा तास महत्त्वाचा असतो. मात्र, हा त्रास सर्वांनाच होईल असे नाही. त्यामुळे घाबरून न जाता प्रत्येकाने लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास लसीकरण केंद्रातच थांबावे, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.
लस घेतल्यानंतरही नियम आवश्यक
लस घेतल्यानंतर नियमानुसार लाभार्थींनी लसीकरण केंद्रामध्ये थांबावे. डॉक्टरांच्या निगराणीत असताना लाभार्थीला काही झाल्यास त्यावर तत्काळ उपचार शक्य आहे. त्यामुळे लस घेतल्यानंतर बाहेर पडण्याची घाई करू नये.
— डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला