फोटो सौजन्य: iStock
राज्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि अन्य लगतच्या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. काही मिनिटांच्या पावसातच रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात होते, त्यामुळे नागरिकांना वाहतुकीत अडथळा, पायाभूत सुविधांचा अभाव आणि आरोग्याच्या समस्या भेडसावतात.
पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे मुख्य कारण म्हणजे नालेसफाईचा अभाव. हे लक्षात घेऊन घनकचरा व्यवस्थापन विभागाने यावर्षी पावसाळ्यापूर्वी सर्व नालेसफाई पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. वेळेत आणि प्रभावीपणे सफाई न केल्यास दरवर्षीप्रमाणेच पावसाळ्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे प्रशासनाने यंदा वेळेवर तयारी करण्याचे ठोस पाऊल उचलले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईचे काम ५१ टक्के पूर्ण झाले असून पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची सफाई पूर्ण करण्याचा निर्धार घनकचरा व्यवस्थापन विभागाने केला आहे. यांत्रिक पद्धतीने होणारी मोठ्या नाल्यांची सफाई ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे. आता प्रामुख्याने मोठी यंत्रे जाऊ शकत नाहीत अशा छोटे नाल्यांचा सफाईचे काम सुरू करण्यात आले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समिती क्षेत्रात छोटे आणि मोठे असे सुमारे २७८ किलोमीटर लांबीचे नाले आहेत. त्यातील मोठ्या नाल्यांची यांत्रिक पद्धतीने बहुतांश सफाई झालेली आहे. दाट लोकवस्ती असलेल्या भागात जेथे छोटे नाले आहेत तेथे मोठी यंत्रे जाऊ शकत नाहीत. तेथे आता नालेसफाईचे काम सुरू झाले आहे.
Rain Alert : सावधान! पुढचे 6 ते 7 दिवस तुफान पाऊस पडणार, महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना धोका
नालेसफाईच्या कामांची पाहणी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह सर्व परिमंडळ उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी करीत आहेत. नाल्यांतून काढलेला गाळ शक्य तितक्या लवकर हलविण्यात यावा, असे निर्देश या पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत. नियोजित वेळेत नालेसफाईची कामे पूर्ण होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नालेसफाईबाबतच्या तक्रारींची नोंद घेण्यासाठी प्रभाग समितीनिहाय संपर्क यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. तेथे येणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्याची सूचना संबंधितांना देण्यात आल्याची माहिती उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) मनीष जोशी यांनी दिली.