फोटो सौजन्य - istock
अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील घनघाव वस्ती येथे एक बिबट्या विहीरीत पडला होता. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने बिबट्याला विहीरीतून बाहेर काढले. मात्र या दरम्यान बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वापरला जाणारा लाकडी पिंजरा तुटला. त्यामुळे विहिरीतून बाहेर येताच बिबट्या पुन्हा पसार झाला. या घटनेमुळे घनघाव वस्ती येथील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बिबट्याचा शोध सुरु आहे.
कोपरगाव तालुक्यातील दशरथ वाडीजवळ घनघाव वस्ती येथे रहिवासी गौतम घनघाव यांची विहीर आहे. विहिरीत बिबट्या पडला असल्याचे शनिवारी सकाळी गौतम घनघाव यांना आढळले. त्यांनी याबाबत तात्काळ स्थानिक प्रशासन आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. याबाबत माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांनी विहीरीभोवती गर्दी केली होती. विहीरीत पडल्याने बिबट्याचा मृत्यू होऊ नये, यासाठी स्थानिकांनी विहीरीत दोरीच्या साह्याने बाज टाकली होती. बिबट्या त्या बाजवर चढून बसला. त्यानंतर दुपारच्या सुमारास वन विभागाचे अधिकारी गावात दाखल झाले. त्यांनी बिबट्याला विहीरीतून बाहेर काढण्यासाठी लाकडाचा पिंजरा आणला होता. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावातील स्थानिकांच्या मदतीने तो पिंजरा विहीरीत सोडला. त्यानंतर बिबट्याला त्या पिंजऱ्यात पकडून विहीरातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र यावेळी अचानक पिंजरा तुटला. विहीरीतून बाहेर येताच बिबट्या गावात पसार झाला.
बिबट्या गावात पसाार झाल्याने गावातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गावात बिबट्याचा शोध सुरु आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी लोखंडी पिंजरा आणण्याऐवजी लाकडी पिंजरा का आणला, असा प्रश्न गाावातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गावातील ग्रामस्थांनी वन विभागाच्या निष्काळजीपणा बद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे, अशी मागणी गावातील ग्रामस्थांकडून केली जात आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सध्या गावात बिबट्याचा शोध सुरु आहे.






