बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम (फोटो - सोशल मीडिया)
प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी महामंडळाचा पुढाकार
प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ दिवसांनी सर्वंकष स्वच्छता मोहीम
एसटीची सकारात्मक प्रतिमा अधिक बळकट करण्याचा प्रयत्न
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर, बसस्थानक (MSRTC) परिसरात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ दिवसांनी सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांना अधिक स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी सुविधा मिळाव्यात तसेच एसटीची सकारात्मक प्रतिमा अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात येत आहे.
या मोहिमेंतर्गत बसस्थानकातील बैठक व्यवस्था, फरशी, भिंती, काच, शौचालये, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, महिला विश्रांतीगृहे, कार्यालयीन कक्ष आदींची सखोल स्वच्छता करण्यात येणार आहे. साचलेला कचरा, अनावश्यक झाडे-झुडपे, जाहिरातींचे फलक, जाळी-जळमट यांचे निर्मूलन करून परिसर अधिक स्वच्छ, सुंदर व नीटनेटका केला जाणार आहे. कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र डबे उपलब्ध करून कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण व विल्हेवाट लावली जाणार असून प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी स्वच्छता व नियमित देखभाल ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
या अभियानासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था, विद्यार्थी, नागरिक तसेच एसटीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागातून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. प्रत्येक बसस्थानकावर या मोहिमेची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल, याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांवर सोपविण्यात आली आहे.
MSRTC News: ‘शिवशाही’ व्हेंटीलेटरवर; प्रवाशांनी केली ‘ही’ मोठी मागणी
दर १५ दिवसांनी होणाऱ्या या स्वच्छता मोहिमेमुळे एसटी बसस्थानके अधिक स्वच्छ, आरोग्यदायी व प्रवाशांसाठी आनंददायी ठरणार असून प्रवासी सेवेमध्ये गुणवत्तावाढ होण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
प्रवाशांनी केली ‘ही’ मोठी मागणी
उपन्नात प्रगतीपथावर असूनही नशिबी जुन्या बस प्राप्त झालेल्या गुहागरच्या शिवशाही बस सातत्याने मध्येच रस्त्यात बंद पडत आहेत. स्पेअर पार्ट वेळेवर नसणे, तिकीट जास्त असल्याने उत्पन्न कमी अशी कारणे शिवसाही बसबाबत निर्माण झाल्याने या बसेस बंद करुन त्याठिकाणी लालपरी बस वाढवा, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. दरम्यान, गुहागर आगाराला आणखी नव्या लालपरी बस देण्यात येतील असे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते मात्र, अद्यापही ही मागणी पूर्ण झालेली नसल्याने आगाराच्या मागणीला केराची टोपली दाखविल्याचे बस चालकांमधून बोलले जात आहे.






