धुळे-सोलापूर मार्गावर भीषण अपघात (फोटो सौजन्य : social media)
जालना : जालनामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जालन्यातील धुळे-सोलापूर महामार्गावर हा अपघात झाला. रविवारी रात्री उशिरा साडेअकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अपघातामधील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जालना पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील धुळे-सोलापूर महामार्गावर बारसवाडा फाट्याजवळ रविवारी मध्यरात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये जी. रामू (वय ४५) आणि जी. माधुरी (वय ४०) या दाम्पत्याचा समावेश आहे. हे दोघेही हैदराबादचे रहिवासी होते. हैदराबादहून शिर्डी येथे देवदर्शनासाठी जात असताना अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतदेह जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढावे लागले.
परप्रांतीय दाम्पत्याचा जागीच मृत्यू
अपघातात परप्रांतीय दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला असून, कारमधील इतर जखमी झाले आहेत. या अपघातामधील 5 जण जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळताच, जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामध्ये जखमी झालेल्या 5 जणांना पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले.
जखमींवर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू
जखमींवर सध्या छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती गंभीर आहे. सध्या पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.