स्मार्ट सिटी कंपनी, राज्य शासन आणि महापालिकेच्या संयुक्त उपक्रमातून उभारण्यात आलेली ही जलवाहिनी तांत्रिकदृष्ट्या तयार असतानाही, सुमारे 60 कोटी रुपये खर्चाच्या जलशुद्धीकरण केंद्राचे कामच सुरू न झाल्याने संपूर्ण प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहे.
जागेअभावी प्रकल्प ठप्प
पाकणी येथे प्रस्तावित जलशुद्धीकरण केंद्रासाठी आवश्यक जागा अद्याप वन विभागाकडून हस्तांतरित झालेली नाही. विशेष म्हणजे, जागेचा ताबा मिळण्यापूर्वीच टेंडर प्रक्रिया राबवण्यात आल्याने आता प्रशासकीय अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी, प्रकल्प कागदोपत्रीच अडकून पडला आहे.
क्षमता आहे, पण उपयोग नाही
सध्या महापालिकेकडे उजनी धरणातून पाणी उचलण्याची एकूण 255 एमएलडी (80 + 175) क्षमता उपलब्ध आहे. मात्र, जलशुद्धीकरण केंद्राच्या अभावामुळे अतिरिक्त पाणी प्रक्रिया करून शहरात पुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे नव्याने उभारलेल्या जलवाहिनीचा उपयोग मर्यादित राहिला आहे.
शहरात पाणीटंचाई तीव्र
दरम्यान, शहरातील पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अनेक भागांत तीन ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा होत असून, नागरिकांना पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. वाढत्या उन्हाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नागरिकांचा संताप; तातडीने निर्णयाची मागणी
कोट्यवधी खर्च करूनही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. जोपर्यंत पाकणी येथील जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण होत नाही, तोपर्यंत नव्या जलवाहिनीचा पूर्ण क्षमतेने वापर होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच प्रशासनाने वन विभागाकडील जागेचा प्रश्न तातडीने सोडवून प्रकल्प मार्गी लावावा, अशी जोरदार मागणी आता नागरिकांतून पुढे येत आहे.






