मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. हा निकाल सर्वांसाठी अनपेक्षित असून राज्यामध्ये महायुतीला मोठा फटका बसला आहे. नरेंद्र मोदी यांना 400 नाही तर 300 पार देखील करता आलेले नाही. यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. मात्र तरीही नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनणार आहेत. एनडीए मधील घटकपक्षांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या ‘सामना’ या मुखपत्रातून नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. यामध्ये त्यांनी ‘काँग्रेसने मोदींच्या गर्वाने फुगलेल्या छातीचा फुगा फोडला’ अशी टीका करण्यात आली आहे.
काय आहे ‘सामना’चा लेख?
नरेंद्र मोदी 2014 साली प्रथम सत्तेवर आले तेव्हा ‘काँग्रेसमुक्त भारता’चा नारा त्यांनी दिला. 2024 साली त्याच काँग्रेसने मोदींच्या गर्वाने फुगलेल्या छातीचा फुगा फोडला आहे. काँग्रेसने मुसंडी मारून भाजपच्या बहुमताचे मुंडके उडवले. किमान नऊ राज्यांतून भाजप हद्दपार झाला. भाजपला तेथे खाते उघडता आले नाही. तामीळनाडूसारख्या मोठय़ा राज्यात भाजपला एकही जागा मिळाली नाही. पंजाब हे महत्त्वाचे राज्य आहे. या राज्यातही भाजप खाते उघडू शकला नाही. मेघालय, मणिपूर, नागालॅण्ड, सिक्कीम अशा सीमावर्ती राज्यांत भाजपची कामगिरी शून्य आहे. पुद्दुचेरी, चंदिगढमध्येही भाजप उरलेला नाही. (अर्थात मध्य प्रदेशसह बारा राज्यांत काँग्रेसची हीच दयनीय अवस्था आहे.) उत्तर प्रदेशसारख्या राज्यात काँग्रेस व समाजवादी पार्टीने मिळून भाजपला ‘अर्ध्या’ राज्यातून साफ केले. महाराष्ट्रातील भाजपवर तर मुंडण करून स्वतःचे श्राद्ध घालण्याची वेळ शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आणली. देशातील हे गणित पाहिले तर ‘काँग्रेसमुक्त भारत’ या नारेबाजीची साफ शकले उडाली आहेत. काँग्रेसचे योगदान मानायला मोदी तयार नव्हते. स्वातंत्र्यलढय़ात, देशाच्या प्रगतीत काँग्रेस कोठेच नाही असे मोदीकृत नव भाजपचे म्हणणे होते, पण या वेळी काँग्रेसने शंभर जागांचा टप्पा पार करून मोदी यांचा तर्क खोटा पाडला. भाजपने बहुमत गमावले व नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, चिराग पासवान वगैरे प्रादेशिक पक्षांच्या कुबडय़ा घेऊनच मोदी यांना कडबोळे किंवा खिचडी सरकार बनवावे लागले. मोदी हे संघ प्रचारकाचे कार्य करीत असताना ‘खिचडी’ त्यांना प्रिय होती, असे ते भाषणात सांगतात. आता त्यांना काही काळ खिचडीच खावी लागणार आहे.
मोदी यापुढे हिंदुत्वाचा ‘हि’ सुद्धा काढणार नाहीत
शरद पवार हे भटकती आत्मा व उद्धव ठाकरे नकली संतान असल्याची भाषा मोदी यांनी प्रचारात वापरली, पण त्याच भटकत्या आत्म्याने व नकली संतानाने महाराष्ट्रातून भाजपचे ‘पिंड’ कावळय़ासह उडवून लावले व बहुमत गमावलेला मोदींचा आत्मा प्रादेशिक पक्षांच्या पिंपळावर लटकलेला दिसत आहे. मोदी हे शंभर टक्के व्यापारी आहेत व व्यापारी फक्त स्वतःचा फायदा बघतो. अमित शहा यांनी आंध्रात जाऊन तेलुगू देसमला संपविण्याची भाषा केली होती. चंद्राबाबूंना कधीच ‘एनडीए’मध्ये घेणार नाही, असेही सांगितले होते. नितीश कुमार यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न अमित शहा करीत असल्याचा आरोप स्वतः नितीशबाबूंनीच केला होता. आज सत्तेसाठी त्याच नितीश कुमारांचे चरणतीर्थ मोदी-शहांना प्राशन करावे लागले. सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा गाठताना मोदी-शहा यांची दमछाक झाली. मोदी यांचा तोरा उतरला. मोदी यापुढे हिंदुत्वाचा ‘हि’ सुद्धा तोंडातून काढू शकणार नाहीत. मोदी यांनी जे ठरवले तसे काहीच झाले नाही. कारण मोदी यांचे बोलणे व डोलणे सर्वच खोटे होते. त्यांचे तप, ध्यान हे ढोंग होते. सत्तेसाठी मोदी यांनी आधी पक्षफोडी केली, आता तडजोडी केल्या. कारण ‘काँगेसमुक्त भारत’ करण्याच्या फंदात अर्धा भारत ‘भाजपमुक्त’ झाला व मोदींचा तोरा कुबडय़ांवर लटकला आहे. ‘इंडिया’ने ‘बहुमतमुक्त भाजप’ हे सत्य कृतीत आणले. तरीही मोदी यांना म्हणे जगभरातून अभिनंदनाचे संदेश येत आहेत असा दावा त्यांचे लोक करतात. हे आश्चर्यच आहे!