अमित शाह-देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत बंद दाराआड बैठक; महाराष्ट्राच्या राजकारणावरून मोठी खलबतं?
राज्यातील राजकीय वातावरणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. आधी शिवसेना ठाकरे गटातून खासदार फुटल्यानंतर आता महाविकास आघाडीमधूनही आमदार आणि खासदार फुटणार असल्याच्या चर्चाना वेग आला आहे. अश्यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (मंगळवार, 7 जुलै) गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यामुळे चर्चाना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बंद दाराआड बैठक पार पडली. नर्मदा प्रकल्पाच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये स्वतंत्र चर्चा झाली असून राज्यातील राजकीय घडामोडी, मंत्रिमंडळ विस्तार आणि शिंदे गटाच्या खासदारांबाबत महत्त्वाचे मुद्दे चर्चेत आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असताना अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नर्मदा प्रकल्पासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला गुजरातचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्राला नर्मदा नदीचे पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुमारे तीन तास स्वतंत्र बैठक झाल्याचे सांगितले जात आहे.
INDIA आघाडीला मोठा धक्का? ‘हा’ पक्ष NDA मध्ये जाणार; खासदारांचे मोठे विधान
सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री झालेल्या या बैठकीत महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती, संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि आगामी राजकीय रणनीतीवर चर्चा झाली. मात्र, राज्य मंत्रिमंडळात तातडीने कोणतेही बदल होणार नसल्याचेही सांगितले जात आहे.
अलीकडेच ठाकरे गटातून बंड करून शिवसेना शिंदे गटात दाखल झालेल्या सहा खासदारांपैकी दोघांना केंद्र सरकारमध्ये मंत्रीपद मिळू शकते, अशी चर्चा सुरू आहे. या विषयावरही अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकतात. या विस्तारात काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता असून काही विद्यमान मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. महाराष्ट्रातील काही नेत्यांचीदेखील केंद्रीय मंत्रिपदासाठी चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या काही दिवसांत ठाकरे गटातील बंडखोरी, शिंदे गटाची वाढती ताकद आणि संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






