फोटो सौजन्य: iStock
समीर बेग/ अहिल्यानगर: राहाता – शिर्डी उपविभागात गेल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपयांच्या शासकीय इमारती उभारण्यात आल्या आहेत. आधुनिक पोलिस ठाणे, प्रशासकीय कार्यालये आणि विमानतळ परिसरातील अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा कागदोपत्री सक्षम दिसत असली, तरी प्रत्यक्षात या भव्य इमारतींमध्ये काम करण्यासाठी पुरेसे पोलिस बळ आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या उपविभागीय कार्यक्षेत्रात कोपरगाव, राहाता, शिर्डी, लोणी आणि पुणतांबा या महत्त्वाच्या गावांचा समावेश होतो. धार्मिक, व्यापारी आणि वाहतूकदृष्ट्या हा परिसर अत्यंत संवेदनशील मानला जातो. विशेषतः शिर्डी येथे देश-विदेशातून दररोज हजारो भाविक येतात. विमानतळ सुरू झाल्यापासून व्हीआयपी भेटी, प्रोटोकॉल ड्युटी, सुरक्षा तपासण्या आणि वाहतूक नियंत्रणाचा ताण लक्षणीयरीत्या वाढला आहे.
Ahilyanagar News: भल्या पहाटे ‘एटीएस’कडून छापेमारी! मुकुंदनगरमध्ये धडक कारवाई
राहाता व कोपरगाव तालुक्यांची एकत्रित लोकसंख्या सुमारे ६ लाखांच्या आसपास आहे. त्यात शिर्डीतील दैनंदिन भाविकांची गर्दी, उत्सव काळातील लाखोंची उपस्थिती आणि संभाव्य कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढणारी संख्या लक्षात घेतली तर सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम असणे गरजेचे आहे. सध्या शिर्डी उपविभागात सरासरी ३०० पोलिस कर्मचारी कार्यरत असल्याचे सांगितले जाते. म्हणजे अंदाजे २ हजार नागरिकांमागे १ पोलिस अशी स्थिती आहे. शिफारस केलेल्या प्रमाणानुसार ६ लाख लोकसंख्येसाठी किमान ७५० पोलिसांची आवश्यकता आहे. म्हणजेच जवळपास निम्मे मनुष्यबळ अपुरे असल्याचे चित्र दिसते.
व्हीआयपी प्रोटोकॉल, वाढती गुन्हेगारी, तपासकामे, न्यायालयीन प्रक्रिया, वाहतूक नियंत्रण आणि विमानतळ सुरक्षा या सर्व जबाबदाऱ्यांमुळे पोलिस दलावर प्रचंड ताण आहे. कामाचे तास वाढणे, सुट्ट्या कमी होणे आणि सततची ड्युटी यामुळे कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मोठ्या धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी होमगार्ड व इतर यंत्रणांची मदत घेतली जात असली, तरी कायमस्वरूपी उपायांची गरज आहे.
Tourism News: “पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनस्थळांची…”; मंत्री शंभूराज देसाईंचे स्पष्ट निर्देश
सरकारने आधुनिक इमारती, सीसीटीव्ही, वाहने आणि उपकरणांची उपलब्धता वाढवली आहे. मात्र विकासाचा खरा अर्थ केवळ भौतिक सुविधा नव्हे, तर पुरेसे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. धार्मिक पर्यटनाचे जागतिक केंद्र असलेल्या शिर्डीत सुरक्षा यंत्रणा संख्येने आणि क्षमतेने सक्षम असणे अत्यावश्यक आहे.






