मूर्तिजापूर तालुक्याला सर्वाधिक फटका,
अकोला : जिल्ह्यात ३० आणि ३१ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अतिवृष्टीमुळे जवळपास ४ हजार ४०८ हेक्टरवरील पिके बाधित झाली असून, अकोट तालुक्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच २४ घरांची पडझड झाली. जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान मूर्तिजापूर तालुक्यात झाले. विशेष म्हणजे माना या एकाच मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. याविषयीचा प्राथमिक अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत विभागीय कृषी सहसंचालकांकडे सादर केला. मात्र, प्रत्यक्ष पंचनामे झाल्यानंतर प्रत्यक्ष नुकसानीचे वास्तव समोर येणार आहे.
39 गावात अतिवृष्टीमुळे पिके झाली बाधित
या अहवालानुसार, जिल्ह्यातील अकोट, पातूर आणि मूर्तिजापूर या तीन तालुक्यांतील ३२ गावांमधील ४ हजार ४०८ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. तसेच तेल्हारा तालुक्यात ५ हेक्टरवरील पीक बाधित झाले. जिल्ह्यात ३० व ३१ जुलैपर्यंत सतत दोन दिवस जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामध्ये जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, अकोला व बार्शिटाकळी या सहा तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नदी व नाल्यांना पूर
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नदी व नाल्यांना पूर आला होता. त्यामुळे नदी व नाल्यांच्या काठासह जिल्ह्यातील विविध भागांत शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने पिके पाण्याखाली बुडाली. विविध भागांत सोयाबीन, कपाशी, तूर आदी खरीप पिकांचे गोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यानुषंगाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे जिल्ह्यातील पीक नुकसानीचा प्राथगिक अहवाल विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आला.
असे झाले नुकसान…
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ३९ गावे बाधित झाली. त्यात अकोट १०, तेल्हारा १, पातूर ९, अकोला १ व मूर्तिजापूर तालुक्यात १८ घरांचे नुकसान झाले. ते अकोट तालुक्यात एक व्यक्ती मृत्युमुखी पडला तर जिल्ह्यात २४ घरांची पडझड झाली. तसेच शेती पिकांचे सर्वाधिक नुकसान मूर्तिजापूर तालुक्यात ४ हजार २४१ हेक्टर, अकोट ९५ हेक्टर तर पातूर तालुक्यात ६७हेक्टरवरील पिके बाधित झाली आहे.
पंचनाम्यानंतरच नुकसानीचे वास्तव येणार समोर
कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात केवळ तीन तालुक्यात पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असला तरी, सहा तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याच्या पृष्ठभूमीवर पीक नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतरच वास्तव समोर येणार आहे. एकट्या मूर्तिजापूर तालुक्यात ४ हजार २४१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये कापूस, सोयाबीन व तूर या पिकांचा समावेश आहे.
अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात पावसाने फिरवली पाठ; उमा प्रकल्पामध्ये केवळ 4 टक्के जलसाठा






