अमरावतीतील डफरीन रुग्णालयात अग्नितांडव; ३ नवजात बालकांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील NICU मध्ये अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आगीमुळे निर्माण झालेल्या धुराचे लोट आणि वाढत्या उष्णतेमुळे परिस्थिती गंभीर बनली. या दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनासह अग्निशमन दल आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. NICU मध्ये उपचार घेत असलेल्या बालकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.
या दुर्घटनेत बचाव पथकाच्या तत्परतेमुळे ३६ नवजात बालकांना वेळीच सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. आगीचा विस्तार होण्यापूर्वीच या बालकांना NICU मधून बाहेर काढून अन्य सुरक्षित वार्ड किंवा रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले. बचावण्यात आलेल्या बालकांवर डॉक्टरांकडून लक्ष ठेवण्यात येत असून त्यांच्या प्रकृतीची सातत्याने तपासणी केली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त करत मृत बालकांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर दुर्घटनेत बाधित झालेल्या अन्य नवजात बालकांवर आवश्यक ते सर्वोत्तम उपचार करण्यात यावेत आणि उपचारांचा संपूर्ण खर्च सरकारने करावा, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशीष येरकर यांना दिल्या आहेत.
ही आग नेमकी कशामुळे लागली, रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत होती का, NICU मधील विद्युत आणि अन्य उपकरणांची देखभाल नियमानुसार केली जात होती का, यासह विविध बाबींची चौकशी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आरोग्य प्रशासनाला घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. चौकशीत अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत तीन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि हृदयद्रावक आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश आरोग्य प्रशासनाला देण्यात आले आहेत. या घटनेतील दोषींवर… — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 24, 2026
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे आरोग्यमंत्री आणि आरोग्य सचिव यांना अमरावती येथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णालयातील परिस्थिती, बचावकार्य, बालकांवरील उपचार आणि अग्निसुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जाणार आहे. या दुर्घटनेनंतर सरकारी रुग्णालयांमधील अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः NICU सारख्या अतिसंवेदनशील विभागांमध्ये अग्निसुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन मार्ग आणि उपकरणांची नियमित तपासणी किती काटेकोरपणे केली जाते, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. तीन नवजात बालकांचा जीव घेणाऱ्या या दुर्घटनेचे नेमके कारण उच्चस्तरीय चौकशीनंतर स्पष्ट होणार असून, दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.






