(फोटो - अरविंद केजरिवाल, ट्विटर)
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने सर्व जागांवर आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. यात आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील तयारी सुरू केली आहे. त्यांच्या आम आदमी पक्षाने महाराष्ट्रातील तिसऱ्या उमेदवाराची घोषणा सुरू केली आहे. आम आदमी पक्षाने परभणीतून आपला तिसरा उमेदवार जाहीर केला आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने महाराष्ट्र विधानसभेसाठी आपला तिसरा उमेदवार जाहीर केला आहे. परभणीतून सतीश चकोर यांना परभणीतून उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी आम आदमी पक्षाने मराठवाड्यातील बीड आणि लातूर या ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील प्रमुख पक्षांबरोबरच आम आदमी पक्षाने कंबर कसली आहे.
आम आदमी पक्षाचे राज्य संघटक संग्राम पाटील यांनी परभणीतून सतीश चकोर यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. देशभरात आम आदमी पक्ष हा इंडिया आघाडीसोबत असला तरी महाराष्ट्रात आम आदमी पक्ष स्वतंत्रपणे २८८ जागा लढविणार आहे हे जवळपास स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी प्रीती शर्मा यांनी पत्रकार परिषद राज्यात विधानसभा स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आम आदमी पक्ष हा मुंबईतील ३६ जागांवर लढविण्याचा विचार करत आहे.
लोकसभा निवडणुकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती म्हणजेच एनडीएला पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. कारण मनसेने राज्यात काही ठिकाणी आपले काही उमेदवार जाहीर केले आहेत. राज ठाकरे यांच्या पक्षाने आतापर्यंत ७ उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाप्रमाणेच मनसे देखील स्वबळावर विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे जवळपास निश्चित म्हटले जात आहे.