संग्रहित फोटो
मुंबई : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांचे नाव आल्यानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर, काही काळ ते वैद्यकीय कारणास्तव सार्वजनिक कार्य्रकमापासून दूर होते. आता, ते पक्षाच्या कार्यक्रमात सक्रीय झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता रिकामं ठेवू नका…काहीतरी जबाबदारी द्या…अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली होती. यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे हेही उपस्थित होते. आपल्या भाषणाच्या अखेरीस धनंजय मुंडे यांनी सुनील तटकरे यांच्याकडे एक भावनिक विनंती केली. “मी आज जे काही आहे, ते सुनील तटकरे यांच्यामुळेच आहे. माझ्या हाताला आता काहीतरी काम द्या. कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहा. आम्ही चुकलो तर कान धरा, पण आता आम्हाला रिकामं ठेवू नका. आम्हाला जबाबदारी द्या, असे धनंजय मुंडे म्हणाले. त्यानंतर, आता अजित पवारांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनीही भूमिका मांडली, धनंजय मुंडेंच्या विनंतीचा विचार केला जाईल, असे ते म्हणाले. दरम्यान यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. धनंजय मुंडे यांच्या या जाहीरपणे केलेल्या मागणीतून त्यांना मंत्रिमंडळात नवीन आणि मोठी जबाबदारी मिळेल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रीपदाची इच्छा
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली होती. या प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराडचं नाव समोर आलं. त्याला या हत्येप्रकरणात अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा मानला जातो. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा कार्यकर्ता असल्यामुळे विरोधकांकडून सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला होता. अखेर धनंजय मुंडे यांनी प्रकृतीच्या कारणांमुळे मंत्रिपदाचा राजीनामा देत आहोत, असं सांगत त्यांनी राजीनामा दिला होता. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपदाची आस लागली आहे.