"तो आवाज कानात घुमतो आहे", अपघातापूर्वी अजित पवारांनी शेवटचा फोन कुणाला केला होता?
धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणारे विमान बारामती येथे कोसळले. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी महाराष्ट्रातील बारामती येथे लँडिंग करताना विमान कोसळले. अजित पवार निवडणूक प्रचारासाठी बारामतीला जात होते. विमान क्रॅश-लँडिंग झाले की तांत्रिक बिघाडामुळे हे विमान अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर खाजगी चार्टर विमान पूर्णपणे जळून खाक झाले. या अपघातापूर्वी अजित पवार यांनी शेवटचा फोन केला होता…
आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक दिवसांपैकी एक आहे. काका म्हणून नाही तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणारे, धीर देणारे आणि कठीण प्रसंगी खंबीरपणे उभं राहायला शिकवणारे व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून निघून गेले आहे, ही जाणीव अक्षरशः मन पोखरून टाकणारी आहे. अशी दुःखद भावना मित्रचे उपाध्यक्ष भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे.
लहानपणापासून राजकारण, समाजकारण आणि जबाबदारी यांचा खरा अर्थ त्यांनी कृतीतून शिकवला. शब्दांपेक्षा कामावर विश्वास ठेवणं, निर्णय घेताना लोकहित डोळ्यांसमोर ठेवणं हे सगळं त्यांच्या सहवासातून नेहमीच शिकायला मिळालं. व्यक्तिगत नात्यातील मायेपलीकडे, ते माझ्यासाठी कायम एक आदर्श आणि प्रेरणास्थान राहिले. असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मन अक्षरशः सुन्न आहे. अपघात होण्याच्या काही वेळ आधीच त्यांच्याशी फोनवर संवाद झाला होता. नेहमीप्रमाणे आपुलकीने बोलणारा तो आवाज अजूनही कानात घुमतो आहे. आणि अवघ्या अर्ध्या तासात ही दुर्दैवी बातमी समजली त्या क्षणी काय वाटलं, ते शब्दांत मांडणं खूप कठीण आहे. असे त्यांनी सांगितले आहे.
क्षणार्धात आयुष्य कसं संपून जातं, याची ही भीषण जाणीव प्रचंड त्रासदायक आहे. व्यक्तिगत नात्याच्या पलीकडे, माझ्यासाठी ते कायम मार्गदर्शक आणि एक भक्कम आधार होते. त्या शेवटच्या संवादाची आठवण मनात प्रचंड भावनिक कोलाहल निर्माण करीत आहे, अजूनही विश्वास बसत नाही, अजितकाका सोडून गेले हे स्वीकार करणं अजूनही शक्य होत नाही.
या घटनेने केवळ आमच्या कुटुंबाचं नाही, तर संपूर्ण राज्याचं मोठं नुकसान झालं आहे. कृतिशील, अनुभवी, लोकहितासाठी झटणाऱ्या नेतृत्वापासून वंचित झाल्याची जाणीव अधिक तीव्र होत आहे. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांशी एकरूप होऊन काम करणारा नेता हरपल्याचं दुःख राज्याला दीर्घकाळ जाणवत राहील. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणं कठीण आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच प्रार्थना. असे त्यांनी शोक संदेशात नमूद केले आहे.






