
धाराशिवमध्ये पावसाची दमदार बॅटिंग; ८ जूनपर्यंत अपेक्षेपेक्षा दुप्पट पावसाची नोंद
जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारीनुसार कळंब तालुका सर्वाधिक १२१.९ मिमी पावसासह अव्वल ठरला आहे. या तालुक्यात सरासरीच्या ३४२ टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ भूम तालुक्यात ८५.४ मिमी (२४४ टक्के), परंडा तालुक्यात ७९.५ मिमी (२६५ टक्के), वाशी तालुक्यात ७९.० मिमी (२३६ टक्के), उमरगा तालुक्यात ६३.४ मिमी (२१४ टक्के) आणि धाराशिव तालुक्यात ४२.९ मिमी (१२१ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. तर तुळजापूर तालुक्यात ३७.४ मिमी (११८ टक्के) आणि लोहारा तालुक्यात २१.५ मिमी (७४ टक्के) पाऊस झाला आहे.
कळंब तालुक्यातील काही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीसदृश स्थिती दिसून आली. मोहा मंडळात १६७ मिमी, गोविंदपूरमध्ये १६३ मिमी आणि कळंब मंडळात १४६.१ मिमी पाऊस नोंदविण्यात आला. यामुळे या भागातील ओढे-नाले वाहू लागले असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंडा तालुक्यातील परंडा मंडळात १३२.५ मिमी पाऊस झाला असून तो सरासरीच्या ४४१ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तर भूम तालुक्यातील माणकेश्वर मंडळात १००.४ मिमी, आंबीमध्ये ८१ मिमी, तसेच भूम मंडळात ८२.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. उमरगा तालुक्यातील मुळज मंडळात ११२.६ मिमी पाऊस झाला असून तो सरासरीच्या ३८१ टक्के आहे. वाशी तालुक्यातील पारगाव मंडळात ८५.६ मिमी, तर तेरखेडा मंडळात ७८.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दुसरीकडे काही मंडळांमध्ये अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही. केशेगाव, नळदुर्ग आणि अनाळा मंडळांमध्ये पावसाची नोंद शून्य राहिली आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी अद्याप समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.दरम्यान, छत्रपती संभाजीनगर विभागात ८ जूनपर्यंत सरासरी ३५.७ मिमी पावसाच्या तुलनेत ३०.४ मिमी पाऊस झाला असून विभागीय पातळीवर पर्जन्यमान ८५.२ टक्के आहे. मात्र धाराशिव जिल्ह्याने विभागातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत लक्षणीय आघाडी घेत सरासरीच्या जवळपास दुप्पट पाऊस नोंदविला आहे. मान्सूनच्या सुरुवातीलाच झालेल्या या दमदार पावसामुळे खरीप हंगामासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. जिल्ह्यातील धरणे, तलाव आणि जलस्रोतांच्या पाणीपातळीतही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.