सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : आषाढी एकादशी यात्रा २०२५ करिता मानाच्या १० पालख्यांसोबतच्या १ हजार १०९ दिंड्यांना प्रती दिंडी २० हजार रुपये अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. गतवर्षी आषाढी एकादशी यात्रा सन २०२४ करिता मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये इतके अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्याबाबत प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार २०२३-२४ मध्ये विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडून एकूण १ हजार १०९ दिंड्यांची यादी प्राप्त झाली होती. यावर्षीदेखील दिंड्यांना प्रतिदिंडी २० हजार रुपये याप्रमाणे एकूण २ कोटी २१ लाख ८० हजार रुपये अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे बैठक घेऊन पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांना उत्तम सुविधा देण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनीदेखील आवश्यक सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. प्रशासनातर्फे व्यापक स्तरावर नियोजन करण्यात येत आहे. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीदेखील प्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याने दिंडीतील वारकऱ्यांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होऊ शकतील.
अजित पवारांच्या महत्वाच्या सूचना
आषाढी वारीचा सोहळा जवळ आला असून या वारीसाठी राज्यभरासह देशातील इतर राज्यातून मोठ्या संख्येने भाविक पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत असतात. या काळात पंढरपुरात मोठी गर्दी होत असते. याचपार्श्वभूमीवर आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी; पालखी तळ, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच संपूर्ण पालखी मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोहळ्यासाठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी अजित पवार यांनी यावेळी दिली. विधान भवन पुणे येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-2025 पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.