फोटो सौजन्य - Social Media
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या बुलढाणा जिल्हा कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात द्वितीय तर विदर्भात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ग्रामीण भागात उद्योगांना चालना देत मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करण्यात या कार्यालयाला यश आले आहे. जिल्ह्यास यावर्षी ३१२ भौतिक प्रस्तावांचा लक्षांक देण्यात आला होता. मात्र, या उद्दिष्टापेक्षा अधिक कामगिरी करत तब्बल १ हजार ५२ उद्योजकांचे प्रस्ताव टास्क फोर्स समितीच्या मान्यतेनंतर विविध बँकांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले.
मंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि बँक अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे ३३८ प्रस्तावांना मंजुरी मिळाली. या प्रस्तावांद्वारे एकूण ६८४.२३ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले असून, योजनेच्या १०८ टक्के उद्दिष्टपूर्तीची नोंद झाली आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील तब्बल ५५६ व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला आहे. ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना उद्योग व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यात या योजनेची महत्त्वाची भूमिका ठरत असल्याचे दिसून आले.
या यशामागे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी संजय मोहनराव इंगळे यांचे प्रभावी नियोजन आणि मार्गदर्शन महत्त्वाचे ठरल्याचे सांगण्यात आले. तसेच मंडळाच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या मेहनतीमुळेच ही उल्लेखनीय कामगिरी शक्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, २०२६-२७ या आर्थिक वर्षातही मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेऊन तरुणांनी उद्योग उभारणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे.






