फोटो सौजन्य - Social Media
जिल्हाधिकारी Yogesh Kumbhejkar यांनी वाशिम व रिसोड तालुक्यांना भेट देत जणगणना-२०२७ ही राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची प्रक्रिया असल्याचे सांगितले. १५ मेपर्यंत स्वगणना प्रक्रिया सुरू असून नागरिकांनी त्यात जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच १६ मे ते १४ जून या कालावधीत होणाऱ्या घरगणनेसाठी घरी येणाऱ्या प्रगणकांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या शिबिरांमुळे नागरिकांना विविध कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज कमी झाल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. महसूल विभागाच्या या विशेष उपक्रमामुळे अनेक नागरिकांना विविध सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळत असून प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
तालुकानिहाय आकडेवारीनुसार कारंजा तालुक्यात सर्वाधिक २ हजार ३४३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. मानोरा तालुक्यात १ हजार ३१३, मालेगावमध्ये १ हजार १५३, रिसोडमध्ये ८७९, मंगरूळपीरमध्ये ५८४ तर वाशिम तालुक्यात ३३८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच महसूल अभियानांतर्गत एक खिडकी व्यवस्थेद्वारे अनेक अर्जांचा निपटारा करण्यात आला असून विविध प्रमाणपत्रांचे तातडीने वितरण करण्यात आले. या शिबिरांमुळे नागरिकांना महसुली सेवा जलदगतीने उपलब्ध होत असून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे अधिक सुलभ झाले आहे.






