सौजन्य - नवराष्ट्र टीम
नाशिक : मे महिन्यापासून राज्यात अतिवृष्टीने थैमान घातल्याने खरिप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून, शेतकऱ्यांचे मोठे नुसकान झाले आहे. मायबाप सरकार बळीराजाला भरीव मदत देईल अशी आशा असताना राज्य सरकारने जाहीर केलेले पॅकेज हे फसवे निघाले. हे पॅकेज शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आले पण शेतकऱ्यांसाठी एका दमडीचीही घोषणा केली नाही. बिहार, गुजरात व पंजाब राज्याला केंद्राचे पॅकेज देणाऱ्या नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला मात्र वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांवरील संकट पाहता केंद्र सरकारने राज्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर महाराष्ट्र विभागातील जिल्ह्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत येणाऱ्या आगामी निवडणुकी संदर्भातील रणनीती आणि त्या संदर्भातील आढावा, याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला काँग्रेस कार्य समितीचे सदस्य ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, खासदार शोभा बच्छाव, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले पॅकेज ही घोर फसवणूक आहे. पीकविमा काढलेला असतो, वीज कोसळून मृत्यू झाल्यास पैसे देण्याची तरतूद आहे, त्याचाही अंतर्भाव या पॅकेजमध्ये करण्यात आलेला आहे. ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये, जमीन खरडून गेली त्यासाठी हेक्टरी ५ लाख रुपये व कर्जमाफी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने पहिल्यापासून लावून धरली आहे. पंतप्रधान मुंबईत आले आणि मित्राच्या विमानतळाचे उद्घाटन करून गेले. पण महाराष्ट्रावर मोठे नैसर्गिक संकट कोसळलेले असताना त्यांनी त्यावर एक शब्दही उच्चारला नाही हा महाराष्ट्राचा घोर अपमान आहे. जनतेत सरकारविरुद्ध तीव्र असंतोष आहे, तो पंतप्रधानांच्या दौऱ्यात दिसू नये म्हणून एक फसवे पॅकेज जाहीर केले पण सरकारचे पॅकेज म्हणजे राजा उदार झाला व हाती भोपळा दिला, असा प्रकार आहे.
निवडणुकांवर डोळा ठेवून विमानतळाचे उद्घाटन
नवी मुंबई विमानतळ प्रत्यक्षात सुरु होण्यास अजून अवधी आहे पण निवडणुकांवर डोळा ठेवून घाईघाईने उद्घाटन उरकण्यात आले आहे. याआधीही नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रातील भव्य शिवस्मारकाचे जलपूजन करण्यात आले, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे उद्घाटनही करण्यात आले, त्याचे काय झाले. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या, १०० स्मार्ट सिटी, कृषीवर आधारीत उद्योग याचे काय झाले, हे आपण पाहिले आहे. असंही सपकाळ म्हणाले.