उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भारत पाकिस्तान युद्धावर दिली प्रतिक्रिया (फोटो - सोशल मीडिया)
सोलापूर : राज्य शासन दुष्काळग्रस्त भाग पाणीदार करण्यासाठी विविध जलसंधारणाची कामे राबवत आहे. दुष्काळग्रस्त भागाला पाणी उपलब्ध करणे व सिंचन क्षमता वाढवणे यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, ‘शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत म्हैसाळ उपसा सिंचन योजना व सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी 3 हजार कोटींच्या निधीला मान्यता दिलेली आहे. ताकारी व म्हैसाळ या दोन स्वतंत्र उपसा सिंचन योजना आहेत. सांगोला तालुक्याला देखील सिंचनासाठी पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे. शासन दुष्काळग्रस्त भागाला पाणीदार करून त्या भागातील सिंचन क्षमता वाढवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या शासनाचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारावर चालत आहे’.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जे संविधान दिलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत आहे. जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाऊलखुणा आहेत. तो भाग शासनाच्या वतीने विकसित करण्यात येत असून, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे.
आपल्या राज्याची आर्थिक स्थिती चांगली
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन सरकारकडून राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली होती. तेव्हापासून अनेक महिलांना याचा फायदा होत आहे. मात्र, ही योजना बंद होईल, असे म्हटले जात होते. त्यावरही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माहिती दिली की, ‘आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही’, असेही त्यांनी सांगितले.
सांगोल्याला भरघोस निधी
सांगोला तालुक्याचे विकासासाठी भरघोस निधी देण्यात आलेला असून, पुढील काळातही सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिल्या जाणार नसल्याचे त्यांनी सांगून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी 50 लाखाचा निधी देत असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच सांगोला येथील एमआयडीसी जागा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे.