बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध होणार (फोटो-istockphoto)
मुंबई: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षा फेब्रुवारी – मार्च २०२५ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना ही प्रवेश पत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शुक्रवार दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी ‘ऍडमिट कार्ड’ या लिंक द्वारे डाऊनलोड करण्याकरिता उपलब्ध होतील, असे राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक / प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना याबाबत सूचित करण्यात आले आहे. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत करण्यात आले आहे.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा अगदी जवळ आल्या आहेत, आणि राज्यभरात विद्यार्थी आपल्या परीक्षेच्या तयारीत व्यस्त आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत पेपर फुटी आणि परीक्षा हॉलमधील कॉपीसारख्या घटनांमध्ये झालेली वाढ चिंताजनक आहे. या समस्येला रोखण्यासाठी आणि परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत प्रत्येक परीक्षा कक्षात CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत, ज्यामुळे परीक्षा प्रक्रियेवर पूर्ण नियंत्रण ठेवता येईल. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
राज्यातील एकूण ७००० परीक्षा केंद्रांवर हा निर्णय लागू केला जाणार आहे. त्यापैकी ५००० केंद्रे दहावीच्या परीक्षांसाठी आणि ३००० केंद्रे बारावीच्या परीक्षांसाठी निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर किमान १० CCTV कॅमेरे बसवले जातील. हे कॅमेरे परीक्षा हॉलमधील प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवतील, ज्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर फुटी किंवा कॉपीसारख्या गैरप्रकारांसाठी वाव मिळणार नाही. यामुळे परीक्षेची गुणवत्ता सुधारेल आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकतेला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
CCTV कॅमेरे बसवण्यासाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. एका कॅमेऱ्यासाठी २० ते २२ हजार रुपये इतका खर्च येणार आहे. राज्यातील अनेक शाळा आणि शिक्षण संस्था यासाठी आर्थिक मदतीची मागणी करत आहेत. त्यांनी शिक्षण मंडळाने या कार्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती केली आहे. तसेच काही शाळांनी आर्थिक मदतीशिवाय हा निर्णय अंमलात आणणे कठीण असल्याचेही नमूद केले आहे. हा निर्णय लागू झाल्यास विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबद्दल प्रामाणिकतेची भावना वाढीस लागेल. पेपर फुटी आणि कॉपीसारख्या घटनांवर अंकुश लावण्यास मदत होईल. शिक्षण व्यवस्थेवर विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विश्वास पुन्हा दृढ होईल.
हेही वाचा: SSC And HSC Exam: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ‘आता परीक्षा केंद्रावर…’
यंदाच्या वर्षी कधी आहे SSC आणि HSC परीक्षेचे आयोजन?
दहावीच्या विद्यार्थ्यांची यंदाची बोर्ड परीक्षा २१ फेब्रुवारी २०२५ ते १७ मार्च २०२५ दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. तसेच याचा काळात बारावीच्या परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. कॉपी केस तसेच इतर गोष्टी टाळण्यासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे.