लातूर : जिल्ह्यात गोगलगाईच्या प्रादुर्भावामुळे आणि सततच्या पावसामुळे नुकसानीत आलेल्या रब्बी हंगामातील पिकाचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
लातूर जिल्हयात यावर्षी समाधानकारक पाऊस होत असून, खरीपाच्या पीकांची उगवण चांगली होत आहे; मात्र, गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे, असे सांगून आ. रमेश कराड म्हणाले की, गोगलगाय ही एक बहुभक्षी किड आहे. पिकांचे रात्रीच्या वेळी सक्रीय राहून मोठया प्रमाणात नुकसान करते. या गोगलगायीमुळे सोयाबीनसह खरीपांच्या इतरही पीकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
[read_also content=”आता जानकरांच्या पक्षात बंडाळी?; पदाधिकाऱ्यांनी सांगितला ‘रासप’वर हक्क https://www.navarashtra.com/maharashtra/rebellion-in-jankars-party-now-officials-said-the-right-to-rasp-nrdm-305603.html”]
गोगलगायीचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जिल्हाभरात अनेक ठिकाणी गोगलगायीने सोयाबीनसह इतर पीकेही नष्ट केली आहेत. त्याचबरोबर सततच्या पावसामुळे पिके पिवळी पडत आहेत, त्यांची वाढ खुंटली असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे सोयाबीनसह खरीपाच्या पिकांचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार कराड यांनी केली आहे.