"एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत आर्थिक देणी...", परिवहन मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
राज्याच्या कानाकोपऱ्यात अविरत धावणाऱ्या ‘लालपरी’ला जिवंत ठेवणाऱ्या ८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या थकीत आर्थिक देणी मिळालीच पाहिजेत, या ठाम भूमिकेवर मी कायम ठाम आहे, असे ठासून प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मधील कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनवाढीच्या रकमेबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगत त्यांनी नमूद केले की, पहिल्या टप्प्यात शासनाने १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. उर्वरित रक्कमही लवकरच मिळेल, त्यामुळे यापुढे प्रत्येक महिन्याच्या वेतनाबरोबर थकीत वेतनवाढीचा हप्ता देणे शक्य होणार आहे. येत्या धुलीवंदनापूर्वी फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत हप्ता देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. ते महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांच्या पुढाकाराने आयोजित रक्तदान शिबिरास सदिच्छा भेट देताना बोलत होते. या कार्यक्रमास आमदार भाई जगताप, माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते तसेच एसटीचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“रक्तदान शिबिर भरवणे ही सकारात्मक मानसिकतेची साक्ष आहे,” असे सांगत मंत्री सरनाईक यांनी आजवर ३९ वेळा रक्तदान करणाऱ्या श्रीरंग बरगे यांचे कौतुक केले आणि त्यांच्या चाळीसाव्या रक्तदानासाठी शुभेच्छा दिल्या. ठाणे नगरपालिकेत नगरसेवक असताना भरवलेल्या पहिल्या रक्तदान शिबिराची आठवण सांगत त्यांनी तत्कालीन काँग्रेस नेते गोविंदराव आदिक यांच्या सहकार्याची कृतज्ञतापूर्वक नोंद केली.
एसटी कर्मचाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधताना मंत्री सरनाईक म्हणाले, “मी शिस्तीबाबत कठोर वाटत असेन, पण स्वच्छतेविषयी माझी भूमिका स्पष्ट आहे.” प्रत्येक बसस्थानकातील प्रसाधनगृहे व स्वच्छतागृहे स्वच्छ असावीत, यासाठी ते स्वतः लक्ष घालतात, असे त्यांनी सांगितले. परळ आगार भेटीदरम्यान आढळलेल्या दारूच्या बाटल्यांबाबत त्यांनी व्यक्त केलेला रोष पुन्हा अधोरेखित करत, असे प्रकार पुन्हा आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला. “प्रवासी वाहतूक ही केवळ नोकरी नाही, ती सामाजिक जबाबदारी आहे. कर्तव्यभावनेबरोबर सेवाभाव जपला, तरच एसटीची चाके विश्वासाने फिरतील,” असे सांगत प्रत्येक कर्मचाऱ्याने प्रवाशांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
थकीत देणी, वेतनवाढीचा हप्ता आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी घेतलेले निर्णय हे केवळ आर्थिक उपाय नसून, एसटी कर्मचाऱ्यांच्या श्रमाचा सन्मान असल्याचे स्पष्ट करत मंत्री सरनाईक यांनी “कर्मचाऱ्यांचा विश्वास आणि जनतेचा आधार हाच एसटीचा खरा भांडवल आहे,” असे ठामपणे नमूद केले. ‘लालपरी’चा प्रवास अधिक सक्षम, शिस्तबद्ध आणि सन्मानपूर्वक व्हावा, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला.






