सोलर बसवल्यानंतरही बिलांचा शॉक; महावितरणच्या बिलिंग प्रणालीवर नागरिकांचा संताप
भिवापूर : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर (रूफटॉप सोलर) योजनेद्वारे नागरिकांच्या वीज खर्चात बचत व्हावी आणि अक्षय ऊर्जेचा वापर वाढावा, हा मुख्य उद्देश आहे. मात्र, काही लाभार्थ्यांनी सोलर प्रकल्प सुरू झाल्यानंतरही अपेक्षेपेक्षा जास्त वीज बिले येत असल्याची तक्रार केली असून, महावितरणकडून मनमानी पद्धतीने वीज बिल आकारणी होत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लाभार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, सोलर यंत्रणा सुरू झाल्यानंतर वीज बिलात मोठी घट होईल, अशी अपेक्षा होती. अनेक नागरिकांनी या योजनेअंतर्गत काहींनी बँकेकडून कर्ज घेऊन तर काहींनी स्वतःच्या निधीतून घरांवर सोलर पॅनल बसविले आहेत. मात्र, उन्हाळ्याच्या काळात किंवा मागील महिन्यांत काही ग्राहकांना वीज बिल आले नव्हते. तर जुलै महिन्यात वितरित करण्यात आलेल्या बिलांमध्ये सोलर प्रणालीद्वारे निर्मित वीज (जनरेशन रीडिंग) आणि वापरासाठी आयात केलेली वीज (इम्पोर्ट रीडिंग) यामध्ये मोठी तफावत दिसून येत असल्याचा दावा ग्राहकांनी केला आहे.
तुकाराम मुंढे यांच्या आदेशाला कोर्टात आव्हान; मनमानी कारभाराचा केला गेला आरोप
यामुळे सोलर ग्राहकांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याची भावना निर्माण झाली असून, काही लाभार्थ्यांनी सोलर योजना नेमकी ग्राहकांसाठी की वितरण कंपनीच्या फायद्यासाठी?’ असा सवाल उपस्थित केला आहे.
बिलिंग प्रक्रियेची चौकशी करा
दरम्यान, ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, सोलर योजनेचा प्रत्यक्ष लाभ हा नेट मीटरिंग प्रणाली, वीज वापराचे प्रमाण, मीटर रीडिंग आणि बिलिंग पद्धतीवर अवलंबून असतो. त्यामुळे प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र तांत्रिक पडताळणी आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात केंद्र सरकारने तसेच संबंधित विभागाने महावितरणकडील बिलिंग प्रक्रियेची चौकशी करून लाभार्थ्यांच्या तक्रारींची दखल घ्यावी, अशी मागणी सोलर ग्राहकांकडून करण्यात येत आहे.
सोलर लावूनही वीज बिलात कपात न होता वाढ
नागरिकांनी संबंधित विभागाने बिलांची पडताळणी करून चुकीची आकारणी झाल्यास तातडीने दुरुस्ती करावी, तसेच विज बिलापासून दिलासा मिळावा या उद्देशाने आम्ही प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत घरावर रूफटॉप सोलर बसविले. यावेळी मोठ्या प्रमाणात वीज बिल शून्य येईल असा गाजावाजा करण्यात आला होता. त्यासाठी आम्ही घरदार गहाण ठेवून बँकेकडून कर्ज घेतले. मात्र, प्रत्यक्षात सोलर बसवल्यानंतरही वीज बिलात कोणतीही घट झालेली नाही. उलट मागील बिलांच्या तुलनेत वीज देयक अधिक येत असल्याने आर्थिक भार वाढल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जर अशाच प्रकारे योजना राबवली गेली तर ही फसवी योजना असल्याचे चित्र निर्माण होईल.
तपासणीनंतरचे बिल हे रीडिंगनुसारच तयार
या प्रकरणात काही तक्रारी असल्यास सोलर ग्राहकांनी संबंधित बेसूर सबसेंटर येथे महावितरणचे सहाय्यक अधिकारी बागडे यांच्यासोबत संपर्क साधून मीटर रीडिंगची पडताळणी करावी. तपासणीनंतरचे बिल हे रीडिंगनुसारच तयार करण्यात आले असून, यामध्ये महावितरणचा कोणताही हस्तक्षेप नाही.
– राजीव कारगावकर, उपकार्यकारी अधिकारी.






