नाना पटोले यांचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती आरोप (Photo Credit- X)
नाना पटोले म्हणाले की, “आमचे नेते राहुल गांधी यांनी ५ जुलै २०२५ रोजीच पीयूष गोयल यांना इशारा दिला होता की, तुमच्या धोरणांमुळे भारताला अमेरिकेसमोर झुकावे लागेल. आज पंतप्रधान मोदींनी पूर्णपणे शरणागती पत्करली असून राहुल गांधींनी वर्तवलेली भीती खरी ठरत आहे.”
“अदानी अमेरिकेच्या तावडीत सापडले असून त्यांना वाचवण्यासाठी ट्रम्प यांनी प्रयत्न केले आणि दुसरीकडे भारतात महागाई वाढवण्याचे काम मोदी सरकार करत आहे,” असा आरोप पटोले यांनी केला. तसेच, अमेरिकेत हजारो हेक्टरवर यांत्रिकी पद्धतीने शेती होते आणि तिथले सरकार शेतकऱ्यांना मोठी सबसिडी देते. आता अमेरिकन शेतीमाल भारतात आल्यास आपला अल्पभूधारक शेतकरी त्यांच्याशी स्पर्धा करू शकणार नाही आणि उद्ध्वस्त होईल.
“सरकारने व्हेनेझुएलातून डिझेल-पेट्रोल घेण्याचा आणि अमेरिकेचा शेतीमाल भारतात आणण्याचा जो करार केला आहे, तो शेतकरीविरोधी आहे.” लोकसभेत एपस्टीन फाईल आणि काही वादग्रस्त व्हिडिओंवर चर्चा करण्याची मागणी होऊनही लोकसभा अध्यक्ष परवानगी देत नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
लोकसभेत काँग्रेस खासदारांच्या झालेल्या निलंबनावर बोलताना पटोले म्हणाले, “आम्हाला आमच्या खासदारांचा अभिमान आहे. शेतकरी आणि देशासाठी आमचा खासदार एकदाच काय, अनेकदा निलंबित झाला तरी चालेल. खासदार प्रशांत पडोळे नवीन आहेत, मी तिथे असतो तर काय केले असते हे महाराष्ट्राला माहिती आहे. आम्ही आमच्या खासदाराचा जाहीर सत्कार करणार आहोत.”
मोदी सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत आणि आता या करारामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. पंतप्रधान मोदींनी स्वतःचे राजकीय हित जपण्यासाठी देशातील शेतकऱ्यांना विकून टाकले आहे, असा गंभीर आरोप करत नाना पटोले यांनी या कराराचा तीव्र निषेध केला.
काशीतील हिंदुंची शेकडो मंदिरे उद्वस्थ, PM मोदी अन् योगींनी माफी मागावी; नाना पटोलेंची मागणी






