पहिलीतील प्रवेशासाठी ६ वर्षे पूर्ण होणे गरजेचे (संग्रहित फोटो)
पुणे : पहिलीच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात यंदा शिक्षण विभागाने कडक नियम लागू केले आहेत. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत वयाची ६ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. या नियमात एक-दोन महिन्यांचीही तडजोड केली जाणार नसल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट केले आहे.
शिक्षण विभागाने यासंदर्भात सर्व शासकीय, अनुदानित तसेच खासगी शाळांना आदेश जारी केले आहेत. प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांची जन्मतारीख तपासूनच प्रवेश देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अंगणवाड्यांतून किंवा पूर्वप्राथमिक शिक्षणातून पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी जन्मदाखला तपासूनच अर्ज करावा, असे आवाहन प्रशासनाकडून केले आहे. शिक्षणतज्ज्ञांच्या मते, योग्य वयात शिक्षणाची सुरुवात केल्यास मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासाला मदत होते. त्यामुळे बालकांना लहानपणी खेळ, सामाजिक कौशल्ये आणि बालपणाचा आनंद घेण्याची अधिक संधी मिळते.
दरम्यान, राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार शिक्षणाची रचना करण्यात आली आहे. त्यानुसार ६ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना औपचारिक शालेय शिक्षणाची सुरुवात करण्याची शिफारस आहे. याच धोरणानुसार पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
31 डिसेंबरला 6 वर्षे पूर्ण असेल तरच पहिलीत प्रवेश
२०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत विद्यार्थ्याचे वय ६ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. त्या तारखेपर्यंत वय पूर्ण न झाल्यास विद्यार्थ्याला पहिलीत प्रवेश मिळणार नाही. महिनाभराचीही तडजोड होणार नाही.
अनेकांनी केली होती मागणी
काही राज्यांमध्ये पाच वर्षांच्या मुलाला पहिलीत प्रवेश दिला जायचा. त्यामुळे या मुलांची पदवी इतर राज्यातील मुलांच्या तुलनेत एक वर्ष आधी पूर्ण व्हायची. त्यामुळे असे विद्यार्थी सरकारी नोकर भरतीसाठी इतरांच्या तुलनेत एक वर्ष आधी पात्र ठरायचे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पहिलीच्या प्रवेशाची वयोमर्यादा संपूर्ण देशात एकसारखी असावी, अशी मागणी अनेकांनी केली होती.
हेदेखील वाचा : Maharashtra Budget 2026: पर्यटन उद्योगाला अर्थसंकल्पाची खास ‘भेट’; ऐतिहातिक वारसा जपण्यासाठी केली कोटींची तरतूद






