Maharashtra Budget 2026: पर्यटन उद्योगाला अर्थसंकल्पाची खास 'भेट'; ऐतिहातिक वारसा जपण्यासाठी केली कोटींची तरतूद
Maharashtra Budget 2026: आर्थिक वर्ष २०२६-२७ चे अर्थसंकल्प महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केले असून यामध्ये पायाभूत सुविधा, रस्ते आणि जलमार्ग, रोजगार, लाडकी बहीण आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पासाठी तब्बल ७ लाख ६९ हजार ४६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये ४० हजार ५५२ कोटी रुपयांची तूट येत असून ती राजकोषीय तूट ही ३ टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यात यावेळी महाराष्ट्र शासन यशस्वी ठरले आहेत. तर, महसुली तूट ही १ टक्क्यांपेक्षा देखील कमी राहिली आहे.
हे देखील वाचा: “Invest Maharashtra हे व्यासपीठ…”; बजेट मांडताना देवेंद्र फडणवीसांचे विधान
यंदाच्या अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्रासाठी सरकारकडून तब्बल २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये पुणे, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी विविध योजना राबवण्यात येणार आहेत. पुणे येथील संगमेश्वर (तुळापूर) येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे संपूर्ण काम जून २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच सातारा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाचे देखील जतन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांच्या विकासासाठी सुरू करण्यात आलेली सिंधुरत्न समृद्ध योजना ३ वर्षासाठी राबवली होती. त्याला मिळालेल्या यशामुळे पुढील तीन वर्षाकरिता देखील सिंधुरत्न समृद्धी योजना 2.0 प्रस्तावित आहे. धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे स्मारकाचे काम लवकरच हाती घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय सभेत सांगितले.
हे देखील वाचा: Rashida Wapiwala यांचे LabelBlind स्टार्टअप! ब्रँड्ससाठी कंप्लायन्स सुलभ
छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्रा येथे स्मारक बांधण्यात येणार असून पानिपत येथे देखील मराठा शौर्य स्मारक उभारण्यात येणार असून त्याला मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२६ च्या अर्थसंकल्पात ५ ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी तरतूद केली आहे. ज्यामध्ये मदिरांची काम आणि मंदिर परिसरातील पायाभूत सुविधांवर भर देण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ल्यावर पर्यटकांसाठी रोप वे प्रकल्प उभारणार असून नागपूरमध्ये रामटेक येथे तिसरी चित्रसृष्टी उभारणार आहेत. या सगळ्या प्रस्ताविक मंजूर झाले असून काम लवकरच सुरू होणार आहेत.






