( फोटो सौजन्य : AI )
ध्वनी यंत्रणेवर लक्ष ठेवण्याचा निर्णय पोलिस आयुक्तालयाने घेतला आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा सूचना देण्यासाठी पोलिस कधीही संबंधित यंत्रणेचा ताबा घेऊ शकतात. यासह आयोजकांनी स्वयंचलित चित्रीकरण यंत्रणा (सीसीटीव्ही) बसवणे अनिवार्य असून नियम मोडल्यास गुन्हे नोंदवण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
महानगरपालिका निवडणुकीनंतर होणाऱ्या रंगपंचमीचा उत्साह शहरात अधिक राहणार असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्याच वेळी टवाळखोरांना लगाम लावण्यासाठी कठोर भूमिका घेण्यात आली आहे. पाण्याचे कारंजे, रहाड व इतरत्र महिला तसेच तरुणींची छेड काढणाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले जाईल. त्यामुळे अशा हुल्लडबाजांची रंगपंचमी पोलिस ठाण्यात साजरी होण्याची शक्यता आहे.
रहाडीसह कारंज्यांजवळ लाकडी अडथळे (बॅरकेडिंग) करण्यासह अटी व शर्तीच्या अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे. दरम्यान, पंचवटीतील शनि चौक, जुने नाशिकमधील तिबंधा चौक, जुनी तांबट लेन, दंडे हनुमान, कथडा परिसर आणि गोदाकाठावरील दिल्ली दरवाजा येथे रहाड खोदण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
नाशिकमध्ये रंगपंचमीचा उत्साह मोठा असणार आहे. रंगांची उधळण होणार असून यासंदर्भात नियमावली चोख केली आहे. त्याचबरोबर काटेकोर बंदोबस्तही करण्यात आला आहे.
दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच रहाड आणि पाण्याचे कारंजे सुरू राहतील.
वर्ष २०२३ आणि २०२४ मधील रंगपंचमीत लाठीमार झाला होता हे लक्षात घेता परिस्थिती आवरण्यासाठी यंदा कोणतीही बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. त्यामुळे तसा बंदोबस्त करण्यात आला आहे.
वर्ष २०२५ मध्ये तिवंधा चौकात अनियंत्रित गर्दी झाली होती त्यामुळे यंदा अशी अंदाधुंद परिस्थिती उद्भवू नये यासाठी आधीच कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
रहाड आणि कारंज्यांच्या ठिकाणच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी आयोजकांकडे राहील.
आयोजकांनी चित्रीकरण यंत्रणा बसवून त्याबाबतचे फलक लावणे आवश्यक आहे.
गर्दी नियंत्रणासाठी आयोजकांनी विशेष खबरदारी घ्यावी. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त आणि अडथळे उभारले जातील.
पोलिस ठाण्याची पथके, गुन्हे शाखा आणि महिला सुरक्षा पथके (दामिनी मार्शल) तैनात असतील. प्रत्येक ठिकाणी जबाबदार पुरुष आणि महिला स्वयंसेवक असणे अनिवार्य आहे.






