
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मान्सूनमध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आदी भागांतून मोठ्या प्रमाणावर पर्यटक वसई परिसरातील धबधबे, समुद्रकिनारे आणि नैसर्गिक पर्यटनस्थळांवर येत असतात. मात्र, अतिवृष्टी, वेगवान पाण्याचा प्रवाह आणि अपघातांच्या वाढत्या घटना लक्षात घेता नागरिकांच्या जीवित व वित्तहानीची शक्यता टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
वसई, नायगाव आणि वालीव पोलीस ठाण्यांनी वाढती गर्दी आणि संभाव्य अपघातांचा धोका लक्षात आणून दिल्यानंतर हा आदेश लागू करण्यात आला. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी छेडछाड, टिंगलटवाळी, अश्लील हावभाव, शेरेबाजी किंवा लज्जास्पद वर्तन करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना नियमांचे पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले असून, पावसाळ्यात धोकादायक पर्यटनाचा मोह टाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
या काळात संबंधित पर्यटनस्थळांवर पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पावसाच्या पाण्यात उतरून पोहणे, खोल पाण्यात जाणे, धबधब्याखाली बसणे, धोकादायक ठिकाणी किंवा कठड्यांवर उभे राहून सेल्फी काढणे अथवा चित्रीकरण करणे यावरही बंदी असेल. याशिवाय मद्यपान करून किंवा मद्य बाळगून पर्यटनस्थळी प्रवेश करणे, अनधिकृत मद्यविक्री, सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन, धोकादायक पद्धतीने वाहने उभी करणे किंवा बेदरकार वाहन चालविणे यावरही कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या आदेशानुसार वसई पोलीस ठाणे हद्दीतील सुरुची बीच, रानगाव बीच, ब्रह्मपाडा बीच, भुईगाव बीच, बेनापट्टी बीच तसेच वसई किल्ला जेटी आणि पाचूबंदर जेटी, नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोटी धबधबा व कामण देवकुंडी, वालीव पोलीस ठाणे हद्दीतील राजीवली खदान आणि खैरपाडा-धुमाळनगर खदान परिसरात १०० मीटरच्या परिघात विविध निबंध लागू राहणार आहेत.
पर्यावरण संवर्धनालाही या आदेशात महत्त्व देण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक, काचेच्या बाटल्या, थर्माकोल किंवा इतर कचरा टाकण्यास मनाई करण्यात आली असून ध्वनी, वायू आणि जलप्रदूषण होईल अशा कोणत्याही कृतीवर बंदी घालण्यात आली आहे. मोठ्या आवाजात डीजे, संगीत यंत्रणा किंवा वाहनांमधील स्पीकर वाजवण्यासही परवानगी दिली जाणार नाही.