सौजन्य - नवराष्ट्र टीम
भीमाशंकर परिसरातील दुर्गम व डोंगराळ भागातील आदिवासी शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने स्ट्रॉबेरीची लागवड केली होती. मात्र तीर्थक्षेत्रातील मंदिर काही महिन्यांपर्यंत बंद राहिल्याने पर्यटकांची वर्दळ कमी झाली आणि स्थानिक बाजारपेठ ठप्प झाली. परिणामी स्ट्रॉबेरी विक्रीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव आणि तालुका कृषी विभाग, आंबेगाव यांनी समन्वय साधत शेतकऱ्यांची स्ट्रॉबेरी थेट खरेदी करण्याचा निर्णय घेतला. प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्या पुढाकाराने प्रकल्पांतर्गत कार्यरत मध्यवर्ती स्वयंपाकगृहामार्फत स्ट्रॉबेरीची खरेदी सुरू करण्यात आली.
स्ट्रॉबेरी हे नाशवंत फळ असल्याने पुणे-मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेत घेऊन जाणे लहान शेतकऱ्यांना परवडत नव्हते. या अडचणीवर उपाय म्हणून थेट खरेदीची व्यवस्था करण्यात आली. खरेदी केलेली स्ट्रॉबेरी आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या आहारात समाविष्ट करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमी बाजारपेठ उपलब्ध झाली असून, विद्यार्थ्यांना ‘व्हिटॅमिन-सी’युक्त ताजी व पौष्टिक फळे मिळू लागली आहेत.
हे सुद्धा वाचा : कोल्हापुरकरांनो, पाणी जपून वापरा; 2 दिवस होणार अपुरा पाणीपुरवठा
भीमाशंकर स्ट्रॉबेरी महोत्सव आयोजित करणार
तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना आधुनिक लागवड तंत्रज्ञान, सूक्ष्म सिंचन, खत व्यवस्थापन व काढणीनंतरच्या प्रक्रियेबाबत प्रशिक्षण देण्यात आले. आदिवासी विकास विभागामार्फत लागवडीसाठी अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, यंदा १७८ शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली असून, प्रत्येक शेतकऱ्याला ५ गुंठ्यांसाठी सुमारे ४७ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. प्रशासकीय पाठबळामुळे या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, अनेक शेतकरी नव्या उत्साहाने स्ट्रॉबेरी लागवडीकडे वळले आहेत. भीमाशंकर परिसराला स्ट्रॉबेरी उत्पादनाचे केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी तसेच या उत्पादनाला व्यापक ओळख मिळवून देण्यासाठी ‘भीमाशंकर स्ट्रॉबेरी महोत्सव’ आयोजित करण्याचा मानस प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी व्यक्त केला आहे.
“शासन आणि प्रशासनाने योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे आमचे पीक वाया जाण्यापासून वाचले आणि मोठे आर्थिक नुकसान टळले. कृषी विभागाचे तांत्रिक मार्गदर्शन व प्रकल्प कार्यालयाच्या खरेदी उपक्रमामुळे आम्हाला हमी बाजारपेठ मिळाली आहे. या पाठबळामुळे शेतकरी नव्या उत्साहाने शेतीकडे वळत आहेत.” — अर्जुन भारमळ, प्रगतशील शेतकरी, फुलवडे.






