संग्रहित फोटो
निकालानंतर ‘मशाल’चे वर्चस्व
खेड तालुक्यातील एकूण ८ जिल्हा परिषद गटांपैकी ५ गटांवर ‘मशाल’ चिन्हाने (शिवसेना उबाठा गट) दणदणीत विजय मिळवला आहे. तर ३ गटांवर ‘घड्याळ’ चिन्हावर (राष्ट्रवादी काँग्रेस) उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालामुळे आमदार बाबाजी काळे यांचे तालुक्यातील राजकीय नेतृत्व अधिक भक्कम झाल्याचे स्पष्ट झाले असून, ‘मशाल’ चिन्हाला ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळाल्याचे दिसून आले आहे.
पंचायत समिती निकाल : स्पष्ट बहुमत ‘मशाल’कडे
पंचायत समितीच्या निकालांकडे पाहता शिवसेना (उबाठा) गटाला निर्णायक बहुमत मिळाले आहे. शिवसेना (उबाठा) गट – ९ सदस्य विजयी, राष्ट्रवादी काँग्रेस – ६ सदस्य विजयी, शिवसेना (शिंदे गट) – 1 सदस्य विजयी. या आकडेवारीनुसार पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना (उबाठा) गट अत्यंत मजबूत स्थितीत असून, सत्ता स्थापनेचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती
माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला काही महत्त्वाच्या जागांवर यश मिळाले असले, तरी तालुक्यावर अपेक्षित वर्चस्व प्रस्थापित करण्यात पक्षाला अपयश आले आहे. विशेषतः ग्रामीण भागात ‘मशाल’ चिन्हाचा वाढता प्रभाव आणि संघटनात्मक ताकद राष्ट्रवादी काँग्रेससाठी आगामी काळात चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.
हे सुद्धा वाचा : भाजपची हॅट्रिक; विधानसभा, महापालिकांनंतर आता जिल्हा परिषदेतही भाजपचं नंबर १चा पक्ष
या निकालांचा राजकीय संदेश काय?
खेड तालुक्यात आमदार बाबाजी काळे यांचे नेतृत्व पुन्हा एकदा जनतेने ठामपणे मान्य केले आहे. पंचायत समितीवर शिवसेना (उबाठा) गटाची सत्ता येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक पातळीवर ‘मशाल’ चिन्ह हे आता केवळ पक्षचिन्ह न राहता राजकीय ताकदीचे प्रतीक बनले आहे. एकूणच, खेड तालुक्यातील या निवडणुकांनी स्पष्ट संदेश दिला असून, राजकीय सत्ता-समीकरण पूर्णतः आमदार बाबाजी काळे यांच्या बाजूने झुकले आहे. ‘मशाल’चा उजेड अधिक तेजस्वी झाला असून, येणाऱ्या काळात तालुक्याच्या राजकारणावर त्याचा प्रभाव निर्णायक ठरण्याची चिन्हे आहे.






