संग्रहित फोटो
जिल्हा परिषद नाणेकरवाडी–म्हाळुंगे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार गणेश बोत्रे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत दणदणीत विजय मिळवला. स्थानिक पातळीवर विकासकामे, ग्रामस्तरावरील प्रश्न आणि सर्वसामान्य मतदारांशी असलेला थेट संवाद हे विजयाचे प्रमुख कारण ठरल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
पंचायत समिती नाणेकरवाडी गणातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या रुपाली दिपक कांबळे यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला. महिलांचा सहभाग, स्थानिक कार्यकर्त्यांचे संघटन आणि प्रचारात घेतलेली आक्रमक भूमिका याचा या विजयात मोठा वाटा राहिला. दरम्यान, पंचायत समिती म्हाळुंगे गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विनया सुधीर मुंगसे यांनी विजय संपादन केला. या निकालामुळे म्हाळुंगे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत झाल्याचे चित्र असून, आगामी काळात पंचायत समितीतील सत्तासमीकरणात राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला. फटाके फोडून, एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त करण्यात आला. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणा सतर्क होती. या निवडणुकीच्या निकालामुळे खेड तालुक्यातील स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार झाले असून, विकासकामे, स्थानिक प्रश्न आणि प्रशासनावर प्रभाव टाकण्यासाठी आता जिल्हा परिषद व पंचायत समिती पातळीवर नव्या रणनीती आखल्या जातील, असे संकेत मिळत आहेत.






