तेर जिल्हा परिषद गटातील निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप; सक्षणा सलगरांची खासदार-आमदारांवर घणाघाती टीका
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : तेर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या पराभूत उमेदवार व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत जिल्ह्यातील राजकारण ढवळून काढले आहे. राजकीय हाडवैराचा दिखावा करताना प्रत्यक्षात ‘गावकीपेक्षा भावकीला प्राधान्य देत’ भाजपाच्या अर्चना पाटील यांना विजयी करण्यासाठी नियोजनबद्ध राजकारण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तेर गटाचा निकाल जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना सलगर यांनी आपली नाराजी आणि खदखद स्पष्टपणे व्यक्त केली. “तेर गटात गावच्या हिताऐवजी भावकीच्या विजयासाठी राजकारण झाले. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी भावजय असलेल्या अर्चना पाटील यांना निवडून आणण्यासाठी आखलेला प्लॅन यशस्वी झाला. मी त्यांना विजयानिमित्त शुभेच्छा देते,” असे सांगत त्यांनी टोला लगावला.
पुढे बोलताना सलगर यांनी आरोप केला की, “जिल्ह्यात इतर ठिकाणी महाविकास आघाडी अस्तित्वात होती. अगदी शेजारच्या गटातही आघाडी करण्यात आली; मात्र तेर गटात जाणीवपूर्वक आघाडी न करता राजकीय गणिते जुळवली गेली. आपल्या दोघांपैकी कुणालाही दुसऱ्याच्या प्रभावक्षेत्रात प्रवेश मिळू नये, यासाठी हे नियोजन करण्यात आले.”
याचवेळी त्यांनी निवडणूक प्रक्रियेवरही गंभीर आरोप केले. “तेरमध्ये निवडणुकीच्या काळात करोडो रुपयांचा ‘महापूर’ होता. रात्री बारा वाजल्यानंतर अर्चना पाटील यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचे वाटप करण्यात आले. गावातील कुठलेही सीसीटीव्ही फुटेज तपासले, तर सत्य समोर येईल,” असा दावा सलगर यांनी केला. या आरोपांमुळे तेर गटाच्या निकालानंतर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून, या प्रकरणावर संबंधित नेत्यांची भूमिका काय असते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यभरात १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांचे निकाल हाती आले. धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती आले असून, जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपने बाजी मारली आहे. जिल्हा परिषदेच्या 55 जागांपैकी शिवसेना शिंदे गटाला 15 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला 18 जागा मिळाल्या आहे. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाला 8 जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 6 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला 3 जागा मिळाल्या आहेत. तर अपक्ष 4 निवडून आले आहेत. तर समाजवादी पक्षाला 1 जागा मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शऱद पवार पक्षाला एकही जागा मिळाली नाही.






