रायगड : उद्धव ठाकरे सरकारमध्ये असलेले त्यावेळचे तत्कालीन बांधकाम मंत्री व आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलिबाग तालुक्यातील अलिबाग रेवस मार्गावरील कनकेश्वर फाटा येथे कार्लेखिंडकडे जाणाऱ्या चौकाचे रवी शास्त्री चौक सुशोभिकरण म्हणून मोठ्या थाटात उद्घाटन केले होते. परंतु या चौकाचा पाणीपुरवठा विभाग, महावितरण विभाग, बांधकाम विभाग हे अनेक कारणांनी याठिकाणी वारंवार खोदकाम करून चौकाचे विद्रुपीकरण होत असल्याने संतप्त प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्ते व किहीम ग्रामपंचायत सदस्य प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांनी सांगितले. तसेच सदर कनकेश्वर फाटा येथील रवि शास्त्री चौकातील रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्तीची मागणी करत नागरिकांची व वाहनचालकांची होणारी गैरसोय दूर करावी, अन्यथा दोन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असे सांगितले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गणेशोत्सवाच्या तोंडावर रेवस पाणीपुरवठा विभागाने अलिबाग रेवस मार्गावरील कनकेश्वर फाटा येथील कार्लेखिंड बाजूकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत पाण्याची जलवाहिनी फुटल्याने भररस्त्यात खोदकाम करून मागील काही दिवसांपासून तो खड्डा तसाच ठेवला आहे, यामुळे अलिबाग रेवस मार्ग व कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड मार्ग या दोन्ही मार्गावर ऐन गणेशोत्सवाच्या काळात प्रवास करणाऱ्या नागरिकांना व लहानमोठ्या वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, तसेच कार्लेखिंड बाजूकडे जाणारा एक मार्ग बंद असल्याने व याठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने दोन्ही मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे.
मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग डोळे मिटून हे सर्व पाहत असल्याचे पिंट्या गायकवाड यांनी संतप्त होत सांगितले, तसेच संबंधित प्रशासनाने याची गंभीरपणे दखल घेऊन सदर कनकेश्वर फाटा येथील रवि शास्त्री चौकातील पेण कडे जाणारा रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती व पूर्ववत सुशोभिकरण करून नागरिकांना व याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना तसेच वाहनचालकांना दिलासा द्यावा, अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणात रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते व किहीम ग्रामपंचायत सदस्य प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांनी दिला आहे. याकडे संबंधित प्रशासन काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.






