"अजितदादांसारखा ‘दादा’ महाराष्ट्राला पुन्हा मिळणे शक्य नाही" सुधाकर घारे , अस्थिकलशाच्या दर्शनाला कर्जतची जनता लोटली
कर्जत : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या मृत्यूमुळे राज्यभर शोककळा पसरली असून राजकीय नेत्यांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी ही दुख: भावना व्यक्त केल्या आहेत.
अजितदादांचे नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्व महाराष्ट्रात अव्वल होते. दादांच्या जाण्याने महाराष्ट्रात पोकळी निर्माण झाली आहे, दादांच्या सारखा नेता दादा महाष्ट्राला पुन्हा मिळणे शक्य नाही, असे अजितदादांचे कर्तृत्व होते, अशा भावना व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे २८ रोजी बारामतीत विमान अपघातात निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राज्यभरात अजित पवार यांचे अस्थि कलश सर्वसामान्य जनतेच्या दर्शनासाठी फिरवले जात आहेत. अजित पवार यांचा अस्थिकलश ३ जानेवारी रोजी कर्जत शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात दर्शनासाठी आणण्यात आल्या. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे, तसेच पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. या वेळी शहरात शोकाकुल वातावरण होते. मोठ्या संख्येने लोक अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते. नागरिकांनी शांततेत अजितदादांच्या अस्थींचे दर्शन घेत अजितदादांना अखेरचा निरोप दिला. यावेळी अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते.
यावेळी बोलताना घारे म्हणाले, अजितदादा यांच्यासारखे नेतृत्व आपल्यातून निघून जाणे अत्यंत दु:खद आहे. दादांच्या जाण्याने आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच कार्यकर्ते शोकसागरात बुडाले आहेत. अजितदादांच्या जाण्याने आपल्या सर्वांच्या डोक्यावरील छत्र हरपले, अशी भावना निर्माण झाली. त्यांच्या निधनाने सर्वांना चटका लागून राहिला.
अजितदादांच्या जाण्याने मोठा धक्का महाराष्ट्राला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सामान्य कार्यकर्त्याला देखील बसला. अशा कठीण प्रंसगात श्रीमती सुनेत्रा वहिणी पवार यांनी पक्षाला स्थिर ठेवलं पाहिजे, यासाठी पक्षाने त्यांच्या हाती उपमुख्यमंत्रीपदाची आणि पक्षाची धुरा दिली. अत्यंत कठीण प्रसंगात त्यांनी धैर्य दाखवत ही धूरा आपल्या हातात घेतली. अशा कठीण प्रसंगात वहिणींनी पक्षातील सामान्य कार्यकर्त्याला आधार दिला, असे सुधाकर घारे यावेळी म्हणाले.






