रेल्वेमंत्र्यांचे मराठवाड्याकडे दुर्लक्ष; मुंबई, पुणे, नागपूरला प्राधान्य मात्र...
छत्रपती संभाजीनगर : देशातील प्रमुख शहरांशी रेल्वे मार्गाशी जोडून धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे घोषित करण्यात आले. तसेच वाहतूक क्षमता दुप्पट करण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. असे असतानाही, राज्याचे महत्त्वाचे औद्योगिक व पर्यटन केंद्र असलेल्या छत्रपती संभाजीनगरचा या योजनेत समावेश न करता पुन्हा एकदा मराठवाड्यावर अन्यायच करण्यात आला असल्याचे दिसते.
छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्यातील प्रमुख शहर असून येथे दरवर्षी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. औद्योगिक वसाहती, धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटनस्थळे तसेच शिक्षणासाठी शहराकडे वाढणारा ओढा पाहता रेल्वे सुविधांचा विस्तार अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट चित्र आहे. रेल्वे प्रशासनाच्या धोरणात्मक नियोजनात मुंबई, पुणे व नागपूर या शहरांचा समावेश करण्यात आलेला असताना, छत्रपती संभाजीनगरसारख्या महत्त्वाच्या शहराला वगळण्यात आल्याने मराठवाड्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, हे शहर पर्यटनाच्या दृष्टीने राज्याचे प्रमुख प्रवेशद्वार मानले जाते; तरीही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव समोर येत आहे.
दरम्यान, कोणत्याही शहराचा अशा योजनेत समावेश करण्यासाठी प्रवासी संख्या, तांत्रिक व्यवहार्यता आणि राज्य शासनाची शिफारस या बाबींचा विचार केला जातो. मात्र, छत्रपती संभाजीनगरसारख्या शहरासाठी आवश्यक असलेली दखल अद्याप घेतली गेलेली नाही, ही बाब आता अधिक ठळकपणे समोर येत आहे.
छत्रपती संभाजीनगरचा रेल्वे विकासासाठी समावेश व्हावा
छत्रपती संभाजीनगरचा रेल्वे विकासासाठी समावेश व्हावा, यासाठी स्थानिक पातळीवर रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब वारंवार आणण्यात आली आहे. प्रवासी संघटना, नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक घटकांनी मागणी करूनही अद्याप ठोस निर्णय झालेला नाही, ही बाबही अधिकृत पातळीवर मान्य करण्यात आली आहे.
शहराचा सर्वांगीण विकास गंभीर अडचणीत?
रेल्वे क्षमतेत वाढ ही केवळ महानगरांची मक्तेदारी नसून, मराठवाड्यासारख्या विभागांच्या विकासासाठी ती तितकीच आवश्यक आहे. संभाजीनगरचा या योजनेत समावेश न झाल्यास, भविष्यातील प्रवासी वाढ आणि शहराचा सर्वांगीण विकास गंभीर अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेदेखील वाचा : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! आता झोपेत स्टेशन सुटण्याची भीती संपली; रेल्वेने सुरू केली ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सेवा






