(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील कांदोशी, हुंबरी, सवेणी, अस्तान व मुसाड या पाच ठिकाणी नदीतील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र अस्तान गावातील नदीपात्रातील गाळ काढताना मोठ्या प्रमाणावर वाळू गायब झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडगे यांनी केला आहे.
Ratnagiri Politics: ठाकरे सेनेला रत्नागिरीत मोठा धक्का! जिल्हा संपर्क प्रमुख ‘भाजप’च्या वाटेवर
अस्तान येथे नदीपात्राची पाहणी केल्यानंतर बोलताना सचिन धाडगे म्हणाले की, नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा उपयोग केवळ वाळू उपशासाठी करण्यात आला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. नदीतील गाळासह वाळूही गायब झाल्याने या संपूर्ण प्रकरणाची जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत चौकशीची मागणी करण्यात येणार आहे.
नदीपात्रातून काढण्यात आलेला गाळ व मोठे दगड नदीकाठावरच टाकण्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भविष्यात पावसाळ्यात हा गाळ शेतांमध्ये वाहून जाऊन शेतीचे अधिक नुकसान होण्याची शक्यता असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केल्याचेही त्यांनी सांगितले. बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीदेखील करण्यात येणार असल्याचे धाडगे यांनी स्पष्ट केले.
दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या आदेशानुसार आम्ही पाहणीसाठी आलो असता अनेक गंभीर बाबी निदर्शनास आल्या. स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरून या कामाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न संबंधित ठेकेदाराने केल्याचा आरोपही त्यांनी केला. कामाबाबत जाब विचारण्यासाठी सकाळपासून दुपारी अडीच वाजेपर्यंत शिवसेना पदाधिकारी संबंधित ठेकेदाराची वाट पाहत होते. मात्र ठेकेदार घटनास्थळी उपस्थित राहिला नसल्याचे त्यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकरणाबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याचे धाडगे यांनी सांगितले.यावेळी महायुतीतील कथित श्रेयवादाबाबत विचारले असता, “खेड तालुक्याचा विकास रामदासभाई कदम यांच्या नेतृत्वाखाली झाला असून योगेशदादा कदमही विकासकामे प्रभावीपणे राबवत आहेत. मात्र काही राजकीय पुढाऱ्यांना ही विकासकामे पाहवत नसल्याने श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, अस्तान येथील नदीतील गाळ काढण्याच्या कामातून वाळूचोरी झाल्याचा आरोप पुढे आल्याने तालुक्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली असून चौकशीत नेमके सत्य काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता विद्यार्थ्यांना मिळणार एसटीचे डिजिटल ‘रूपे कार्ड’; सवलतीच्या दरात तिकीट मिळणार






