तब्बल 3 किमी धावत राहिली विनाब्रेक एसटी बस; चालक-वाहक गंभीर, तर 30 प्रवाशांना किरकोळ दुखापत (संग्रहित फोटो)
जळगाव : धुळ्याहून भुसावळकडे जाणाऱ्या एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे ती सुमारे ३ किलोमीटरपर्यंत अनियंत्रित अवस्थेत रस्त्यावर धावत होती. या दरम्यान बसमधील ५० ते ६० प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. सुदैवाने, बस रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा कठड्याला धडकून थांबली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात सुमारे ३० ते ३५ प्रवासी जखमी झाले आहेत.
प्रवाशांनुसार, बस पारोळ्याहून निघाल्यानंतर एरंडोलजवळील धारागीर गावाजवळ पोहोचण्यापूर्वीच बसच्या मागील भागातून मोठा खडखडाट आवाज येऊ लागला होता. काही वेळातच चालकाच्या लक्षात आले की, बसचे ब्रेक निकामी झाले असून, वाहनावरील नियंत्रण सुटले आहे. त्यानंतर ही बस कधी रस्त्यावर तर कधी रस्त्याच्या खाली उतरत सुमारे ३ किलोमीटरपर्यंत धावत राहिली. या काळात प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि जीव वाचवण्यासाठी सर्वांनी एकच टाहो फोडला. तसेच घटनास्थळी गोंधळ घातला.
दरम्यान, बस अनियंत्रित असताना तिची काही चाकेही निखळली होती. अखेर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा कठड्याला जाऊन धडकली, ज्यामुळे तिचा वेग थांबला. ही धडक इतकी जोरदार होती की, बस चालक आणि वाहक (कंडक्टर) गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी धुळ्याला पाठवण्यात आले.
बसच्या दुरुस्तीबाबत प्रश्न
बहुतांश प्रवाशांना अंतर्गत दुखापत झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या तांत्रिक बिघाडाबाबत एसटी महामंडळाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. दरम्यान, प्रवाशांनी एसटी बसच्या देखभाल-दुरुस्तीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
‘आपली बस, आपली सेवा’ १ मे पासून एसटीचे नवे अभियान
महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला सज्ज होत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने “आपली बस आपली सेवा” या व्यापक अभियानाच्या माध्यमातून प्रवासी सेवेला एक नवी दिशा देण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केली आहे. त्यानुसार एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सविस्तर परिपत्रक जारी केले आहे.






