कोल्हापुरात येत्या 28 सप्टेंबरला राज्यव्यापी मराठा मेळावा; बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन (संग्रहित फोटो)
गारगोटी : अखिल भारतीय मराठा महासंघाचा राज्यस्तरीय मराठा मेळावा कोल्हापूर येथे रविवारी (दि.28) होत असून, या मेळाव्यास मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी गारगोटी येथे केले. राज्यस्तरीय मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ते प्रत्येक तालुक्याचा दौरा करत आहेत. गारगोटी येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
मुळीक पुढे म्हणाले, आपण गावगाड्यावरील सर्व जाती-धर्मांबरोबर घेऊन जाणारे आहोत. शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात तोच विचारलं मांडला, अशा भूमीत हा मराठा मेळावा होत असून, हे आपले भूषण आहे. या मेळाव्यात मराठा आरक्षणावर चर्चा होणार असून, त्याशिवाय कुणबी नोंदीसाठी सातारा संस्थानाचे गॅझेट व कोल्हापूर संस्थानाचे गॅझेटवरही चर्चा होणार आहे.
तसेच विध्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेच्या सोई, सवलती, शिष्यवृत्ती व आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या विविध योजना व मराठा समाजाच्या एकंदरीत आर्थिक, सामाजिक विकासाबद्दल चर्चा होणार आहे, कोल्हापूरला साजेसा असा हा मेळावा होणार असून भुदरगड तालुक्यातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
हेदेखील वाचा : मराठा समाजानंतर आता बंजारा समाज उतरला रस्त्यावर; आरक्षणासाठी काढला मोर्चा
यावेळी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविणसिंह सावंत यांचेही भाषण झाले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष नामदेव चौगले, प्राचार्य डी एस देसाई, मच्छिन्द्र मुगडे, पार्थ सावंत यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
10 लाखांची मदत
मराठा आरक्षणासंबंधी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाशी संबंधित अत्यंत संवेदनशील निर्णयात, महाराष्ट्र सरकारने आत्महत्या केलेल्या 21 जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या निर्णयानंतर, या कुटुंबियांना एकूण २ कोटी १० लाख रुपये दिले जातील.