राजगुरूनगर : सर्वसामान्य व्यक्तीचे मरणही महाग झाले असून व्यक्ती मेल्यावर होणारा खर्च आता सर्वसामान्य माणसाच्या अवाक्याबाहेर जात आहे. दशक्रिया वा अन्य विधी करण्यासाठी आता सर्वसामान्य कर्जबाजारी होवू लागलेत. त्यामुळे या अनिष्ट प्रथा बदलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रवचन व कीर्तनकार हभप भरतमहाराज थोरात यांनी चास ( ता. खेड ) येथे एका कार्यक्रमात व्यक्त केले.
-माणसाच्या मृत्यनंतरचा सोहळा घातक
‘दिवसेंदिस रूढी, परंपरा यांना तिलांजली देवून नवनवीन ट्रेंड समाजात पसरताहेत. त्यामुळे या ट्रेंडचा सर्वसामान्य व्यक्तिंना कसा त्रास होतो याविषयी भाष्य करताना हभप भरतमहाराज थोरात बोलत होते. त्यांनी सांगीतले की, माणूस मेल्यावर त्याचा सोहळा करणे घातक ठरत असून त्याचा त्रास मात्र दुःखात असलेल्या परिवाराला होत आहे. मृत व्यक्तिंच्या घरातील लोक दुःखात असल्याने सभोवतालची चार माणसे जे सांगतील किंवा जे म्हणतील ते ऐकण्याची शोकाकुल परिवाराची तयारी असते.”
-दशक्रिया निधीतून दांभिकता वाढतेय
“दशक्रिया विधी धार्मिक महत्त्व असणारा विधी अलीकडे धार्मिकतेपेक्षा, दांभिकता वाढीस लागली आहे. दशक्रिया विधी निमित्त शोकाकुल परिवाराला होणारी आर्थिक मदत म्हणजे दुखवट्याचा प्रकार बंद करून पाकिट वाटपाची अनिष्ठ प्रथा सुरु झाली आहे. वेगवेगळ्या संस्थांना दिलेली आर्थिक मदत संबधितांपर्यंत न पोहचता त्याचा गैरवापर होतो. पंधरा, वीस हजार भांडून घेणारा सेलिब्रिटी धंदेवाईक महाराज प्रवचनाला बोलवायचा, तर पाच हजार रुपये घेऊन सुत्रसंचालन करणारा निवेदक, असे प्रकार वाढीस लागलेले आहे. ही देण्याची प्रथा आल्याने सर्वसामान्य माणूस कर्जबाजारी होतोय. ज्यांची ऐपत असेल त्यांनी हे जरूर करावे, त्याबद्दल काही आक्षेप नाही, परंतु लोकलज्जा व लोकआग्रहास्तव गोरगरिबांना सरसकट भरडले जाते, म्हणून कधी कधी वाटतं आजकाल जगण्यापेक्षा मरणं महाग झाले.” असे थोरात महाराज म्हणाले.
-दशक्रियेच्या जेवणाचाही इव्हेंट झाला
भरतमहाराज थोरात पुढे म्हणाले, सध्या दशक्रियेच्या जेवणाचाही इव्हेंट झालेला असून भाऊबंदांनी केलेला स्वयंपाक आता कालबाह्य झाला आहे. आचाऱ्याला माणसांनुसार ठरवून देवून वेगवेगळे पदार्थ कसे ताटात येतील हे पाहिले जात आहे. पण यामध्ये शोकाकुल परिवाराला हस्तक्षेप करता येत नसल्याने त्यांना बघ्याची भूमीका घ्यावी लागते.