संग्रहित फोटो
राजगुरुनगर : विकासाचा वेग कायम ठेवत नागरिकांवर कोणताही करभार न टाकता राजगुरुनगर नगरपरिषदेचा सन २०२६–२७ या आर्थिक वर्षाचा तब्बल १२२ कोटी ८० लाख रुपयांचा अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. बुधवार (दि. २५) रोजी नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्या मार्गदर्शनाखाली लेखा विभागाने तयार केलेला हा अर्थसंकल्प उपनगराध्यक्ष मनोहर सांडभोर यांनी सभागृहात मांडला. “विकासाला चालना आणि नागरिकांना दिलासा” हे या अर्थसंकल्पाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले आहे.
अर्थसंकल्प दृष्टिक्षेपात
महसुली जमा : २१.५१ कोटी
भांडवली जमा : १०१.२८ कोटी
एकूण अपेक्षित जमा : १२२.८० कोटी
महसुली खर्च : २९.४८ कोटी
भांडवली खर्च : १०९.४० कोटी
अखेरची शिल्लक : २६ लाख
अपेक्षित उत्पन्नाचे प्रमुख स्रोत
संकलित कर : ७.३८ कोटी
पाणीपट्टी : २.५० कोटी
बांधकाम विकास शुल्क : २.५० कोटी
नगरपालिका सहाय्यक अनुदान : २.५० कोटी
नगरपरिषदेकडून स्थानिक उत्पन्नवाढीवर भर देत आर्थिक शिस्तीचे पालन करण्यात आले आहे.
विकासकामांवर विशेष भर
भीमा नदी स्वच्छता व संवर्धन : ५ कोटी
पाणीपुरवठा योजना व विस्तारीकरण : १.५० कोटी
जलसंधारण उपक्रमांना प्राधान्य
शहरातील जलस्रोतांचे जतन आणि स्वच्छतेसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
रस्ते बांधकाम व डांबरीकरण : ५ कोटी
अधिसूचित नागरी सेवा व सुविधा : १० कोटी
दिवे व विद्युत खांब उभारणी : ५० लाख
सांडपाणी व गटार व्यवस्थापन सुधारणा
मुख्य व अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीमुळे शहरातील वाहतुकीला दिलासा मिळणार आहे.
कचरा संकलन व प्रक्रिया : १.२० कोटी
पाणीपट्टी व वीजबिल : १.५० कोटी
हे सुद्धा वाचा : इंदापूर नगरपरिषदेचा अर्थसंकल्प एकमताने मंजूर; ‘या’ कामांसाठी विशेष तरतूद
सामाजिक न्याय, सर्वसमावेशक विकासाचा संदेश
महिला व बालकल्याण, दुर्बल घटक तसेच दिव्यांग नागरिकांसाठी प्रत्येकी ५ टक्के स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचा संदेश या अर्थसंकल्पातून स्पष्टपणे दिसून येतो. या अर्थसंकल्पातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. आर्थिक समतोल राखत विकासाची गती कायम ठेवण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न नागरिकांसाठी दिलासादायक ठरला आहे. राजगुरुनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, आगामी वर्षात शहराचे रूप अधिक सुशोभित आणि सुविधायुक्त होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.






