तारकपूर स्थानकात सवलतीचा ‘स्मार्ट’ छळ; ज्येष्ठ नागरिकांची ससेहोलपट, १५ दिवसांची प्रतीक्षा (फोटो सौजन्य- पोपट पिटेकर)
गेल्या काही दिवसांपासून तारकपूर स्थानकावर स्मार्ट कार्डसाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. दररोज शेकडो नागरिक याठिकाणी येत असूनही महामंडळाने केवळ एकच खिडकी सुरू ठेवली आहे. तांत्रिक अडचणी आणि संथ इंटरनेटमुळे एका कार्डासाठी १५ ते २० मिनिटे लागतात. त्यामुळे सकाळपासून रांगेत उभे राहिलेल्या ज्येष्ठांचा नंबर सायंकाळपर्यंतही येत नाही. “जर गर्दी एवढी आहे, तर प्रशासनाने अतिरिक्त काउंटर का उघडले नाहीत?” असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
स्थानक परिसरात ज्येष्ठांसाठी साध्या मूलभूत सुविधाही पुरवल्या गेलेल्या नाहीत
बैठक व्यवस्थेचा अभाव: रांगेत उभ्या असलेल्या वृद्ध महिला आणि पुरुषांना बसण्यासाठी साध्या खुर्च्या किंवा बाकड्यांची सोय नाही. अनेक ज्येष्ठ नागरिक जमिनीवर किंवा पायऱ्यांवर बसून आपली पाळी येण्याची वाट पाहत आहेत.
पिण्याचे पाणी: उन्हाचा कडाका वाढत असताना स्थानकावर पिण्याच्या पाण्याची कोणतीही विशेष व्यवस्था रांगेत असलेल्या लोकांसाठी केलेली नाही.
उन्हाचा तडाखा: रांगेचा काही भाग उघड्यावर येत असल्याने ज्येष्ठांना उन्हाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
प्रशासकीय गोंधळ इथेच थांबत नाही. अनेक ज्येष्ठांना ‘तुमचे स्मार्ट कार्ड प्राप्त झाले आहे’ असे मेसेज महामंडळाकडून पाठवण्यात आले आहेत. मात्र, हे ज्येष्ठ नागरिक जेव्हा कार्ड घेण्यासाठी खिडकीवर जातात, तेव्हा त्यांना “कार्ड अजून आले नाही, १५ दिवसांनी चौकशी करा” असे सांगून रिकाम्या हाती परत पाठवले जात आहे. मेसेज येऊनही कार्ड का मिळत नाही? आणि जर कार्ड आले नसेल तर मेसेज का पाठवले जातात? अशा दुहेरी कात्रीत नागरिक अडकले आहेत.
आम्ही आयुष्यभर या राज्याची सेवा केली, टॅक्स भरला. आज वयाच्या ७५ व्या वर्षी एका कार्डासाठी आम्हाला असे रांगेत ताटकळत ठेवणे हा आमचा अपमान आहे. सरकारने सवलती जाहीर करून आमचे उपकार केलेले नाहीत, पण त्यासाठी आम्हाला अशा प्रकारे लाचार करणे थांबवावे, अशी प्रतिक्रिया एक संतप्त ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.
१. अतिरिक्त खिडक्या: वाढती गर्दी लक्षात घेता तात्काळ किमान ३ ते ४ जादा काउंटर सुरू करावेत.
२. टोकन पद्धत: रांगेत तासनतास उभे राहण्यापेक्षा टोकन देऊन बसण्याची व्यवस्था करावी.
३. पाणी आणि सावली: रांगेच्या ठिकाणी पिण्याचे पाणी आणि आडोशाची सोय करावी.
४. स्पष्ट संवाद: कार्ड उपलब्ध नसल्यास नागरिकांना विनाकारण चकरा मारायला लावू नये.
तारकपूर स्थानकातील हा ‘स्मार्ट’ छळ थांबवण्यासाठी विभाग नियंत्रक तातडीने पावले उचलणार की ज्येष्ठांचे हे हाल असेच सुरू राहणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.






