संग्रहित फोटो
पाचगणी : मुख्यमंत्र्यांच्या तालुक्यातील कोयनेच्या भूमिपुत्रांची (Koyna Dam) अद्यापही परवड चालू असून, दोन दिवसापूर्वी शिंदी ते आरवला जोडणारा पूल ग्रामस्थ स्वतः दुरुस्त करताना पूल कोसळून झालेल्या अपघातात तीन ग्रामस्थ गंभीर जखमी झाल्याने या विभागात खळबळ उडाली आहे.
कोयना धरण ही महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असून, या जलाशयाशेजारील सातारा जिल्ह्यातील (Satara Distict) शिंदी, वलवण, आरव, मोरणी, म्हाळुंगे, उचाट, वाघावळे, लामज, निवळी, अकल्पे, गाढवली आदी गावे आपत्तीच्या वेळी नेहमीच संपर्कही न होतात. याकडे मात्र जिल्हा प्रशासन गांभीर्याने पाहत नाही. या गावांना बाजारहाट करण्यासाठी खेडला जावे लागते. त्याला जोडणारा रघुवीर घाट ही असुरक्षित आहे.
शिंदी ते मोरणीला जोडणारा नदीवरील लोखंडी पूल गेली दहा वर्षापूर्वी पडला असून, याची दुरुस्ती न झाल्याने ही गावे अनेक समस्यांना तोंड देत आहेत. प्रशासनाने या गावातील लोकांसाठी बोट दिली होती. परंतु, गेली कित्येक वर्ष जनता या पुलासाठी आक्रोश करीत आहे पण याचा आवाज मुख्यमंत्र्यांच्या कानी पडत नाही. ग्रामस्थांनी चक्क स्वतः स्वखर्चाने हा पूल बांधण्याचा निर्णय घेतला. सर्वजण एकवटले आणि कामाला सुरुवात झाली. पण अचानक हा पूल पडला आणि ग्रामस्थ या पुलाखाली सापडले. या अपघातात रामचंद्र नाना शिंदे, आणाजी बर्गे आणि विनोद जयसिंग मोरे हे गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी त्यांना लागलीच उपचारासाठी खेड येथे नेले परंतु पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला कळवा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आडमुठ्या धोरणामुळे दुर्दैवाचा फेरा
कोयना या दुर्गम विभागातील शिंदी ते मोरणी हा 14 किलोमीटरचा रस्ता गेल्या 35 वर्षांपासून वनविभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकला आहे. या समस्यांसाठी शिंदी येथील नवतरुण मित्र मंडळ नेहमी सक्रिय आहे परंतु त्यांना कसलेही यश येताना दिसत नाही.
अशा अपघातांना जबाबदार कोण ?
आम्ही आमच्या जमिनी कोयनेसाठी दिल्या असताना आम्हाला मात्र आता अनेक यातना सहन कराव्या लागत असून शासन मात्र आमचेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. आमच्या सुविधा आम्हालाच कराव्या लागत आहेत. मग अशा अपघातांना जबाबदार कोण ? या अपघातातील जखमींना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थ भूषण मोरे यांनी सांगितले.