कोकणातील शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी (फोटो- सोशल मीडिया )
आमदार भास्कर जाधव यांचे मुखमंत्र्यांना पत्र
कोकणात मराठवाडा, विदर्भाप्रमाणे मदत देण्याची मागणी
पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
चिपळूण: अवकाळी पाऊस, वादळे आणि परतीच्या पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांच्या उदरनिवाहाचे एकमेव माध्यम असलेल्या भातपिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने मराठवाडा, विदर्भासाठी दिलेल्या मदतीप्रमाणेच कोकणातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी राज्याचे मुखमंत्री यांच्यासह कृषी तसेच मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष
पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी प्रचंड चिंताग्रस्त असून शासनाने याची दखल घेऊन तात्काळ पंचनामे करावेत. भातपिकावर शेतक-यांचा उदरनिर्वाह चालतो. हातातोंडाशी आलेले पिक डोळ्यांदेखत वाया जात असल्याचे पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. कोकणातील शेतकरी कितीही नुकसान झाले, संकटात सापडला, अन्याय झाला किवा कर्जबाजारी असला तरी आत्महत्या करत नाही. त्यामुळे सरकार कोकण्वतील शेतक-यांकडे कायमच दुर्लक्ष करत आलेले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.






