'आम्हाला अनुदानाचे थकित हफ्ते मिळणार तरी कधी?' लाडक्या बहिणींची सरकारला हाक (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील महिलांसाठी चांगलीच फायद्याची ठरताना दिसत आहे. महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहिण’ योजनेतून आता 67 लाखांपेक्षा अधिक महिलांना वगळण्यात आले आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या आणि योजनेच्या पात्रता निकषांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांची ओळख पटल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मात्र, अनेक महिलांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे अद्याप आले नसल्याची परिस्थिती सध्या आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, राज्यातील केवळ १.८० कोटी महिलांनी ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली. २.५ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहिण योजना पात्रता उल्लंघनाच्या प्रकरणांमध्ये अडकली आहे. यापूर्वीही अनेक अपात्र लाभार्थ्यांना काढून टाकण्यात आले आहे. त्यानंतर सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले आणि सर्व लाभार्थ्यांची छाननी सुरू केली. विधानसभा निवडणुकीत ‘गेमचेंजर’ ठरलेली लाडकी बहीण योजना आता प्रशासनासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. दोन महिन्यांपासून हफ्ते न मिळाल्याने संतप्त झालेल्या बहिणींनी थेट हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत थकीत हप्त्यांसाठी जोरदार निदर्शने केली.
हेदेखील वाचा : PMC Elections 2026 : लाडक्या बहिणींच्या हातात हप्ता अन् मनात प्रश्न! महिला मतदार कुणाच्या पारड्यात?
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. आपला हप्ता खात्यात जमा झाला आहे की नाही, केवायसी पूर्ण आहे की अडचणीत आहे, याची चौकशी करण्यासाठी शेकडो महिला सकाळपासून कार्यालयात ठाण मांडून होत्या. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता काढण्यात आलेल्या या मोर्चामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
…त्यांनाच मिळणार नियमित लाभ
ई-केवायसीची अंतिम मुदत वाढवली जाणार नाही. सर्व पात्र महिलांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन केले. मंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरही असंख्य महिलांनी ही प्रक्रियाच पूर्ण केली नाही. आता, ज्या महिलांनी त्यांचे ई-केवायसी पूर्ण केले त्यांनाच नियमित लाभ मिळेल. योजनेची अखंडता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी खऱ्या गरजू महिलांपर्यंत लाभ पोहोचतील, याची खात्री करण्यासाठी हे सरकारी पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
पोर्टलवर तक्रार करूनही दखल नाहीच
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत अनेक महिलांना लाभ मिळाला आहे. मात्र, सध्या ई-केवायसी करूनही अनेक महिलांना अनुदानापासून वगळण्यात आले आहे. त्यात सरकारच्या अधिकृत पोर्टलवर त्यासंबंधी तक्रार करूनही कोणतीही दखल अथवा प्रतिसाद दिला जात नसल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. त्यामुळे महिलांना अनुदान नेमके कोणत्या कारणास्तव थांबवण्यात आले, याची माहिती मिळू शकत नाही. परिणामी, हजारो बहिणींच्या अडचणीत वाढ झाली आहे.






