पदार्थाची चव वाढवण्यासाठी जेवणात कायमच आवश्यकतेनुसार मीठ टाकले जाते. मिठाशिवाय जेवणाला चांगली चव लागत नाही. पण अतिप्रमाणात मिठाचे सेवन करणे शरीरासाठी अतिशय धोक्याचे ठरते. मिठामध्ये असलेल्या घटकांमुळे शरीरातील सोडियमची पातळी झपाट्याने वाढते आणि हृदय, किडनीच्या आरोग्याला हानी पोहचते. बाहेरचे अन्न, पॅक केलेले ज्यूस किंवा इतर पदार्थ बनवताना मिठाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. याशिवाय सॅलड किंवा कोणतीही फळे खाताना त्यावर मीठ टाकून खाल्ले जाते. पण जास्त मीठ खाल्ल्यामुळे किडनी निकामी होऊन आरोग्य बिघडते. त्यामुळे दैनंदिन आहारात किंवा कोणतेही पदार्थ बनवताना मिठाचा वापर आवश्यकतेनुसार करावा. (फोटो सौजन्य – istock)
सॅलड आणि फळांवर मीठ टाकून खात असाल तर थांबा! किडनीच्या आरोग्याला पोहचू शकतो धोका

दररोज १,५०० मिलीग्रामपेक्षा जास्त सोडियम सेवन करू नये. पण आहारात तुम्ही यापेक्षा जास्त मीठ खात असाल तर किडनीला हानी पोहचू शकते. त्यामुळे दैनंदिन आहारात अतिशय कमी प्रमाणात मीठ खावे.

जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्यामुळे शरीरात पाणी साचून राहते, ज्यामुळे सूज येणे, पोट फुगणे इत्यादी समस्या उद्भवतात. अतिमीठाचे सेवन केल्यामुळे फिटनेसवर परिणाम होण्याची शक्यता असते.

जास्त प्रमाणात सोडियम सेवन केल्याने शरीरातील द्रवपदार्थांचे संतुलन बिघडते, ज्यामुळे शरीराला पुरेसे पाणी मिळत नाही. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर डिहायड्रेशनचा धोका वाढतो.

कोरडे तोंड आणि वारंवार घसा ओला करण्याची इच्छा होणे ही लक्षणे सुद्धा मिठाचे प्रमाण वाढल्यामुळे दिसून येतात. सोडियमच्या उच्च पातळीचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसून येतो.

अतिमीठाचे सेवन केल्यामुळे वारंवार लघवीला होणे, सतत पाणी पिण्याची इच्छा होणे इत्यादी लक्षणे वाढू लागतात. मीठ मूत्रपिंडांवर परिणाम करते, ज्यामुळे रक्त शुद्ध करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात.






