फोटो सौजन्य: iStock
आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात गोमातेची अवैध वाहतूक, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवर होणाऱ्या अमानुष अत्याचारांविरोधात राज्य सरकारने आता कठोर भूमिका घेतली असून, “गोमातेची तस्करी आणि कत्तल कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही,” असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार परिवहन विभागाने संपूर्ण राज्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक अधिकारी, सीमा तपासणी नाके, तसेच वाहतूक यंत्रणेला २५ मे ते २८ मे २०२६ या कालावधीत युद्धपातळीवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून राज्याने देशी गाईला ‘राज्यमाता’चा सन्मान दिला आहे. हिंदू समाजासाठी गोमाता ही श्रद्धेचा आणि संस्कृतीचा विषय आहे. अशा पवित्र गोमातेची कत्तल करून तिची अवैध वाहतूक करणाऱ्यांना आता कायद्याचा कठोर धडा शिकवला जाईल.”
ते पुढे म्हणाले, “विशिष्ट सणांच्या काळात गोमातेची तस्करी वाढते, गोवंशाला कोंबून, उपाशी ठेवून, अमानुष पद्धतीने वाहनांमध्ये भरले जाते. हा केवळ कायद्याचा भंग नसून हिंदू समाजाच्या श्रद्धांवर घाला आहे. अशा गोतस्करांविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल.”
परिवहन आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, राज्यातील सीमावर्ती भाग, मुंबईसह प्रमुख शहरे आणि संवेदनशील मार्गांवर विशेष नाकाबंदी व वाहन तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. जनावरांची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाणार असून, आवश्यक परवानग्या, प्रमाणपत्रे आणि प्राणी कल्याण नियमांचे पालन झाले आहे का, याची पाहणी केली जाईल.
“नरेंद्र मोदी हे पुढील वर्षापर्यंत पदत्याग करतील,” राहुल गांधी यांचा मोठा दावा
सरनाईक यांनी स्पष्ट केले की, “मोटार वाहन कायदा, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि केंद्र शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही. नियमबाह्य वाहतूक करणारी वाहने थेट जप्त करण्यात येतील.”
या मोहिमेत परिवहन विभागासोबत स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस, पशुसंवर्धन विभाग आणि विविध गोसेवा व प्राणी कल्याण संस्थांचा समन्वय साधण्यात येणार आहे. अवैध कत्तलखान्यांना होणारा जनावरांचा पुरवठा रोखण्यासाठी विशेष पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत.
“गोमाता संरक्षण हा केवळ कायद्याचा विषय नसून हिंदुत्वाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. मुक्या जनावरांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात सरकार झुकणार नाही. राज्य सरकार गोसंरक्षणासाठी कटिबद्ध आहे,” असेही प्रताप सरनाईक यांनी ठामपणे सांगितले. या विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
डिझेल-पेट्रोलसाठी जनतेमध्येच हाणामारी, हर्षवर्धन सकपाळ सरकारवर भडकले!






