
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray Meet at Midnight: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगला असलेल्या वर्षा या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचा दावा काही माध्यमांकडून केला जात आहे. या भेटीवरून राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क- वितर्क लढवले जात आहेत. या चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
ही बातमी समोर आल्यानंतर ना ना तर्कवितर्क लढवले गेले. महत्त्वाची बाब म्हणेज खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारले असता, त्यांनी आपल्याला याविषयी काही माहिती नाही, फडणवीस आणि ठाकरे हेच त्यावर बोलतील, अशी प्रतिक्रीया दिली. संजय राऊत यांच्या या प्रतिक्रीयेमुळे तर या प्रकरणात अधिकच सस्पेन्स तयार झाला. अशातच यासंदर्भात थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना या भेटीविषयी माध्यमांनी प्रश्न केला. त्यावर फडणवीस यांनी स्पष्टपणे या भेटीच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
Ratnagiri Crime: बायपास झाल्याचे माहित असूनही छातीवर हल्ला, रत्नागिरीत जुन्या वादातून हत्या;
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंना जर मला भेटायचं असेल किंवा आम्हाला भेटायचं असेल तर ती लपून -छपून भेट घेण्याची आवश्यकता नाही. ती खुलेआमही होऊ शकते. लपवण्यासारखे असे कुठलेच विषय आमच्यामध्ये नाही. अशी कोणतीही भेट आमच्यात घडलेली नाही. काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या आणि खोट्या बातम्या पसरवत आहेत. आमची अशी कोणतीही भेट घडली नाही. काही लोक जाणीवपूर्वक आमच्या भेटीच्या खोट्या बातम्या देत आहेत, त्या खोटारड्या हँडल्सना नोटीस बजावली जाईल, असा इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला.
दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसकडून हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास फडणवीस आणि ठाकरे यांच्यात भेट झाल्याचा दावा करण्यात आला होता. पण या भेटीबाबत ठाकरे शिवसेना आणि फडणवीस यांच्याकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे ही भेट प्रत्यक्षात झाली की नाही, याबाबत अद्यापही संभ्रम आहे.
राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची कथित भेट विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. विशेषतः मध्यरात्री २ वाजता ही भेट झाल्याचा दावा समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना वेग आला. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘प्रबुद्ध भारत’ या मीडिया हाऊसकडून २३ एप्रिल रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. या पोस्टमध्ये “उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्री सुमारे २ वाजता मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान ‘वर्षा’ येथे भेट दिली,” असा दावा करण्यात आला होता.
मात्र, या सर्व चर्चांवर भाजपकडून स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी हा दावा फेटाळून लावत सांगितले की, “देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची कोणतीही भेट झालेली नाही. अशा प्रकारची बातमी पूर्णपणे खोटी आहे.” या प्रकरणामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, सोशल मीडियावर पसरलेल्या दाव्यांबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे.