Sangli, Jat, Drowning Incident, Tragedy, Local News, Breaking News, Sangli Diaries, Maharashtra Accident,
Sangali Accident News: जत तालुक्यातील सनमडी येथे शुक्रवारी दुपारी सुमारे साडेतीनच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी घटनेत दोन शाळकरी मुलांचा साठवण तलावात बुडून मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.हर्षद संजय कांबळे (वय १६) आणि जगदीश वसंत मोरे (वय १५) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. हर्षदने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती, तर जगदीश नववीत शिक्षण घेत होता. दोघेही एकत्र तलावावर गेले असताना ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सनमडी येथील साठवण तलावाचा मत्स्य ठेका कुणीकोनूर येथील संजय कांबळे यांच्याकडे आहे. शुक्रवारी ते आपल्या मुलीच्या सीईटी परीक्षेसाठी विटा येथे गेले होते. त्यावेळी त्यांच्या जागी काम करणारा मजूर तलावावर मासेमारीसाठी गेला होता. त्याच्यासोबत हर्षद कांबळे आणि त्याचा भाचा जगदीश मोरे हे दोघेही गेले होते.
तलावाच्या काठावर बसले असताना अचानक एका मुलाचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसऱ्यानेही पाण्यात उडी घेतली. मात्र, दोघांनाही पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले; परंतु तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता.
सायंकाळी उशिरा दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. रात्री उशिरापर्यंत जत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
या घटनेनंतर मृत मुलांच्या कुटुंबियांना प्रशासकीय दिरंगाईचा सामना करावा लागला. सुरुवातीला घटना उमदी पोलीस हद्दीत येत असल्याने मृतदेह उमदी येथे नेण्यात आले. त्यानंतर पुन्हा सुमारे साठ किलोमीटर अंतरावर जत ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. येथेही शवविच्छेदनासाठी तब्बल साडेतीन तास प्रतीक्षा करावी लागल्याने नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. पंचनाम्यातील काही त्रुटींवरूनही नाराजी व्यक्त करण्यात आली.
हर्षद कांबळे याने दहावीची परीक्षा दिल्यानंतर सैन्यात भरती होण्याचे स्वप्न जोपासले होते. निकालाची प्रतीक्षा करत असतानाच त्याच्या आयुष्याचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






